करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- वटपौर्णिमा म्हणजे भारतीय स्त्रीच्या मनातील श्रद्धेचा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या निष्ठेचा सण. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून, ‘हाच पती जन्मोजन्मी मिळू दे’ अशी प्रार्थना करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. मात्र, बदलत्या काळात ‘मॉडर्न’ होण्याच्या नादात अनेकदा या परंपरेचा अर्थ मागे पडत असून, केवळ देखावा करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते.
पौराणिक मान्यतेनुसार, वटपौर्णिमा हा सण ‘सावित्री-सत्यवान’ यांच्या कथेमुळे साजरा केला जातो. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना, सावित्रीने आपल्या निष्ठेने आणि बुद्धीचातुर्याने यमराजांना प्रसन्न करून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. ज्या वडाच्या झाडाखाली सावित्रीने तपस्या केली होती, त्या झाडाचे प्रतीक म्हणून आजही महिला वडाची पूजा करतात. वडाचे झाड हे अक्षय आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
सध्या अनेक ठिकाणी झाडाची फांदी तोडून घरी आणून पूजा करण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र, विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की, ज्या झाडाला आपण ‘जीवन देणारे’ मानतो, त्याची फांदी तोडून ती निर्जीव करणे कितपत योग्य आहे? एका बाजूला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आणि दुसरीकडे निसर्गाचा संहार करायचा, हा विरोधाभास आजच्या सुजाण स्त्रियांनी समजून घेण्याची गरज आहे.
जर तुम्हाला वडाची पूजा करायचीच असेल, तर ही परंपरा अधिक अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करा. फांदी तोडण्याऐवजी वडाचे छोटे रोपटे विकत आणा. या रोपट्याची विधिवत पूजा करा आणि वटपौर्णिमेनंतर ते रोपटे तुमच्या परिसरातील मोकळ्या जागेत किंवा सोयीच्या ठिकाणी जमिनीत लावा.
तुमच्या एका छोट्याशा कृतीमुळे अनेक बदल घडू शकतात उदा. वडाचे झाड हे सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या झाडांपैकी एक आहे.
तसेच फांदी काही दिवसात वाळून जाईल, पण तुम्ही लावलेले झाड अनेक पिढ्यांना सावली आणि शुद्ध हवा देईल सर्वात महत्वाचे म्हणजे या झाडामुळे पक्षी आणि इतर जीवजंतूंना हक्काचे घर मिळेल.
या वटपौर्णिमेला आपण केवळ परंपरेचे पालन न करता, पर्यावरणाचे रक्षण करून आपल्या पतीला आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला निरोगी आणि दीर्घायुषी ठेवण्याचा नवा संकल्प करूया.
“निसर्ग जगवा, संस्कृती वाचवा!”