मुख्य जलवाहिनीची गळती युद्धपातळीवर दुरुस्त; पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांची तत्परता.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील तांबेपुरा व रामवाडी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला विप्रोजवळील बोगद्याजवळ अचानक गळती लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी कोणताही विलंब न करता थेट घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. शहरात आधीच पाणीपुरवठा विस्कळीत असताना ही गळती गंभीर ठरण्याची शक्यता होती.
घटनेची गांभीर्याने दखल घेत कैलास पाटील यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करत दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे, केवळ सूचना देण्यापुरते न थांबता त्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामावर देखरेख ठेवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले, त्यामुळे संभाव्य मोठा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका टळला.