अमळनेर करांचा आक्रोश पाण्यासाठी 22 जूनला पालिकेवर धडकणार भव्य मोर्चा.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील गंभीर पाणीटंचाई, विस्कळीत नागरी सुविधा आणि नगरपरिषदेच्या कथित निष्क्रिय कारभाराविरोधात शहर विकास आघाडीने 22 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपरिषदेपर्यंत सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “पाणी हा नागरिकांचा हक्क आहे, भीक नाही” अशी ठाम भूमिका घेत आघाडीने नगरपरिषदेवर तीव्र टीका केली आहे.
पालिका निवडणुकीदरम्यान दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांत आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत असून वाढत्या पाणीटंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी विश्वासाने सत्ता दिल्यानंतरही त्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे.
पाणीप्रश्नासोबतच शहरातील खड्डेमय रस्ते, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता, बंद पथदिवे आणि पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाईचा अभाव या समस्यांकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. पदाधिकारी आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे शहर विकासाच्या बाबतीत मागे पडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हांडे व मडके घेऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “हा लढा पाण्यासाठी, जगण्याच्या हक्कासाठी आणि अमळनेरच्या सन्मानासाठी आहे,” असा निर्धारही आघाडीने व्यक्त केला आहे.