कचेरी रोडवरील मृत्यूचा सापळा! रस्त्यातील माती-वाळूमुळे अपघातांची मालिका; प्रशासन झोपेत?
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील कचेरी रोडवर एमएसईबीकडून ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामासाठी डिव्हायडरमधील माती व इतर साहित्य खोदून काढण्यात आले. मात्र अनेक दिवस उलटूनही ही माती व वाळू रस्त्यावरच पडून असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांचा तोल जाऊन दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचे चित्र असून, संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे दिवसभरात पाच ते दहा अपघात होत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. रात्री घडलेल्या एका अपघाताचा फोटो, व्हिडिओ समोर आल्यानंतर या धोकादायक परिस्थितीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपालिका, पीडब्ल्यूडी आणि एमएसईबी प्रशासनाने तात्काळ दखल घेत रस्त्यावर पडलेली माती व वाळू हटवून संभाव्य जीवितहानी टाळावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.