आरक्षण सोडतीचा रणसंग्राम; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावागावात उत्सुकता शिगेला.
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले असून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होताच गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरपंच व सदस्यपदाच्या जागा कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार याकडे इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभांमधून आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असल्याने अनेक गावांतील संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

आरक्षणाच्या अंतिम चित्रानंतर अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काहींची राजकीय स्वप्ने साकार होणार तर काहींना नव्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे. हरकती, सूचना आणि अंतिम अधिसूचना या प्रक्रियेनंतर जुलै महिन्यात आरक्षणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर निवडणुकीच्या हालचालींना अधिक वेग येणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण तालुक्यात “कोणत्या गावात कोणते आरक्षण?” याचीच चर्चा रंगली असून ग्रामपंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.