राष्ट्रीय जनगणना मोहिमेला विरोध; शासकीय कर्मचाऱ्यास धमकावल्या प्रकरणी सलीम टोपी विरोधात एनसीआर दाखल.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील गांधलीपुरा भागात जनगणना प्रक्रियेसाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास दमदाटी करत हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामात थेट अडथळा निर्माण झाल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
माहितीनुसार, प्रगणक दिनेश पालवे हे जनगणना २०२७ च्या पूर्वतयारी अंतर्गत गांधलीपुरा परिसरात माहिती संकलनासाठी गेले होते. यावेळी संबंधित घराची माहिती नोंदविण्याचा प्रयत्न करताच “तू यहां क्यों आया… यहां पे पच्चीस साल से कोई सरकारी अधिकारी आया नहीं… चल निकल यहां से…” अशा शब्दांत त्यांना दमदाटी करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर घर क्रमांक टाकू दिला नसल्याने शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रगणकाने संपूर्ण प्रकार जनगणना नोंदवहीत नमूद करत वरिष्ठांना माहिती दिली.

मुख्याधिकारी तथा जनगणना अधिकारी गणेश शिंदे यांनी या घटनेची तातडीने दखल घेत अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१ व ३५२ प्रमाणे एनसीआर क्रमांक ०५२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. “जनगणना ही देशाच्या विकासासाठी महत्त्वाची प्रक्रिया असून नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करणे कायद्याने बंधनकारक आहे,” असे स्पष्ट करत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी जळगाव येथे बांगलादेशी नागरिक आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. “जनगणना टाळण्यामागे नेमकं कारण काय?” असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शहरातून होत असून अमळनेरातील या घटनेने प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.