नवीन गतिरोधक ठरला जीवघेणा! दाजीबा नगरजवळ अपघातात महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील दाजीबा नगर परिसरात रस्त्यावर नुकतेच टाकण्यात आलेले गतिरोधक जीवघेणे ठरत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक उंच व योग्य सूचना फलक नसलेले गतिरोधक असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. योग्य मापदंड न पाळता, कोणतीही सूचना पाटी किंवा रंगरंगोटी न करता गतिरोधक टाकल्यामुळे निष्पाप जीव गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व शहरातील सर्व गतिरोधकांची तात्काळ पाहणी करावी, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.