करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा तालुक्यातील राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि अष्टपैलू संघटन कौशल्याने अल्पावधीतच जनमानसात स्थान निर्माण केलेले युवा नेते सुनिल बापू सावंत यांचा आज वाढदिवस. ‘जनतेची सेवा हेच ईश्वरी कार्य’ हा वारसा घेऊन वाटचाल करणाऱ्या सुनिल बापूंच्या नेतृत्वाचा करिष्मा आज संपूर्ण करमाळा अनुभवत आहे.
सुनिल बापू सावंत यांना समाजसेवेचे बाळकडू स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्याकडून मिळाले आहे. अण्णांनी आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा आणि जपलेली मूल्ये सुनिल बापू तितक्याच ताकदीने पुढे नेत आहेत. त्यांचे सर्व चुलते आणि बंधू देखील याच निस्वार्थी भावनेने जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. सर्व चुलत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल सावंत यांची सामाजिक व राजकीय वाटचाल चालू आहे.
सुनिल बापूंच्या नेतृत्वातील कणखरपणा नुकताच श्री देवीचा माळ येथील घटनेत पाहायला मिळाला. प्रशासनाकडून येथील भाजी विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार असताना, सर्व छोटे विक्रेते हवालदिल झाले होते. हातावरचे पोट असणाऱ्या या कष्टकऱ्यांनी बापूंची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. क्षणाचाही विलंब न लावता सुनिल बापूंनी प्रशासनाच्या विरोधात दंड थोपटले. “आधी कष्टकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करा, मगच कारवाई करा” अशी ठाम भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला नमते घ्यायला लावले आणि शेकडो भाजी विक्रेत्यांना अभय मिळवून दिले.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सुनिल बापू सावंत यांच्या रणनीतीचा डंका पाहायला मिळाला. ज्या पक्षाला विरोधकांनी ‘कट्यावरचा पक्ष’ म्हणून हिणवले, त्याच पक्षाने सामान्यांचे प्रतिनिधित्व करत दिमाखदार विजय मिळवला. करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पद खेचून आणण्यात बापूंची ‘चाणक्य’ नीती यशस्वी ठरली.
आजच्या धावपळीच्या युगातही सुनिल बापूंकडे न्यायाच्या अपेक्षेने आलेला कोणताही नागरिक रिकाम्या हाताने परत जात नाही. विशेष म्हणजे, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न बापूंच्या मार्गदर्शनाखाली सामोपचाराने सुटतात. त्यामुळेच अनेक सामान्यांना पोलीस स्टेशन किंवा कोर्टाची पायरी चढावी लागत नाही. निष्पक्ष न्याय आणि कोणावरही अन्याय न होऊ देण्याची त्यांची भूमिका कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
केवळ राजकारणच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही बापूंचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या माध्यमातून साजरा होणारा गणेशोत्सव हा करमाळा वासियांसाठी आदर्श ठरला आहे. विलोभनीय देखावे आणि अत्यंत शिस्तबद्ध मिरवणूक ही या मंडळाची ओळख सुनील बापूंच्या मार्गदर्शनाखाली अधिक दृढ झाली आहे.
आज सुनिल बापू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर आणि तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, सर्वस्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना मार्मिक समाचारच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.