बोगस शालार्थ आयडी घोटाळा. अमळनेरपर्यंत पोहोचणारच होता, तपासाचा मागोवा

पोलीस अधिकाऱ्यानेच पुरावे केले नष्ट; बोगस संस्थाचालक शिंदेच्या कारभाराने शिक्षण विभाग हादरला!
अमळनेर : विक्की जाधव
बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने राज्यातील शिक्षण विभागात खळबळ माजवली आहे. यासंदर्भात मार्मिकने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर नाशिक येथील तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना अखेर अटक करण्यात आली असून, त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचे तपासात उघड झाले आहे. गिरी यांच्या चौकशीनंतर तपासाचे सूत्र थेट भडगाव आणि अमळनेरकडे वळले आहे.

दोन दिवसांपासून अमळनेर येथे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी अतुल डहाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाण मांडले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर रिपोर्टच्या आधारे शिंदे नावाच्या संस्थाचालकाच्या संशयास्पद हालचालींचा माग काढला गेला. शिंदेच्या घराची जाड जळती घेण्याआधीच काही संशयित पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी या बोगस संस्थाचालकांना थेट आश्रय दिल्याचा गंभीर आरोप होत आहे.

२०१२ पासून बोगस कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देण्यात येत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर काही प्रतिष्ठितांच्या नातेवाईकांना या संस्थेत बनावट नोकऱ्याही देण्यात आल्याची चर्चा अमळनेरभर रंगली आहे. लाखो रुपयांची उकळपट्टी करून शिक्षण व्यवस्थेवर काळी छाया टाकणारा हा गोरखधंदा अखेर उघड झाला आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना वरिष्ठ अधिकारी संदीप कर्णिक यांनी निलंबित केले असून, तपासाचा फास आता मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. “शिंदेचे झाले वांदे” असे म्हणत अमळनेरमध्ये नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा घोटाळा, आता थेट काळ्या धंद्याच्या मुळावर प्रहार करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील वृत्त लवकरच.