अन् दौंड मधल्या भीमनगर मध्ये घडला सैराट, प्रेमविवाह केल्यामुळे भावाकडून खुनी हल्ला.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड शहरातील भिमनगर येथे शनिवारी चार तरुणांनी मिळून आपल्या बहिणीला पळवून नेवून लग्न केल्याचा राग मनात ठेऊन एका युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केली. यामुळे दौंड शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृताचे नाव केतन विनोद सुडगे (रा. भिमनगर, दौंड) असे आहे. केतनने सुमारे वर्षभरापूर्वी दिक्षा सोनवणेशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तिच्या नातेवाईकांनी विरोध दर्शविला होता. त्यातूनच वाद वाढत गेले होते.
6 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्षय सुडगे याला मित्राकडून माहिती मिळाली की, “तुझ्या भावावर हल्ला होत आहे.” त्यानंतर अक्षय व कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता, निखिल सुनिल चितारे, प्रेम तुशार जाधव, विवेक विनोद कांबळे आणि विक्रांत विनोद कांबळे (सर्व रा. भिमनगर) हे चौघे मिळून केतनवर विटा व गटाराच्या चौकटीने मारहाण करत असल्याचे दिसले. कुटुंबीय जवळ येताच आरोपी पळून गेले,गंभीर जखमी अवस्थेत रक्ताने थारोळ्यात केतन रस्त्यावर पडलेला होता. तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तो औषधोपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
अक्षय सुडगे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी वरील चार आरोपींविरोधात भा. दं. सं. कलम 103 व 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे भिमनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. प्रेमविवाह करणे चुकीचे आहे का हा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.