अपघातग्रस्तांसाठी मोठा दिलासा; राज्य सरकारकडून 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचारांची घोषणा
मुंबई(विशेष प्रतिनिधी-वर्षा चव्हाण)
अपघातग्रस्त रुग्णांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, अपघातग्रस्तांना आता 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध होणार आहेत. यामुळे अपघातानंतर तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळवणे आता अधिक सुलभ होणार आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार, रुग्णालये, संबंधित सोसायटीचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्था यांनी या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात उपचारांची संख्या वाढवणे, उपचार दरामध्ये सुधारणा करणे, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे, तसेच प्राथमिक आरोग्य सेवा योजनेत आणणे यासाठी अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
या निर्णयामुळे अपघातग्रस्त नागरिकांना वेळेवर उपचार मिळणार असून, आर्थिक अडचणींमुळे उपचार न मिळण्याच्या घटनांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.