तूर डाळीच्या दरात घट येण्याची शक्यता; सरकारकडून 3.4 लाख टन तूर खरेदीचा निर्णय
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी/वर्षा चव्हाण)
देशातील तूर डाळीच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. किंमत समर्थन योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत तब्बल 3,40,000 टन तूर डाळीची खरेदी केली असून, त्यामुळे आगामी काळात तूर डाळीच्या दरात घट येण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नऊ राज्यांमधून एकूण 13.22 लाख टन तूर खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 1,30,000 टन तूर कर्नाटकातून खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीत शेतकऱ्यांना 7,550 रुपये प्रति क्विंटलच्या MSP पेक्षा अधिक, तसेच राज्य सरकारकडून 450 रुपये प्रति क्विंटल बोनस मिळत आहे.
2024-25 च्या अर्थसंकल्पात, भारत सरकारने 2028-29 पर्यंत तूर, मसूर आणि उडीद या डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता साधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी केंद्रीय संस्था देशभरातून डाळींची खरेदी करतील.
ताज्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत उत्पादनात वाढ झाली असली तरी, डाळींच्या मागणी-पुरवठा तफावतीमुळे भारताला अजूनही आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, सरकारच्या या पावलामुळे डाळींच्या किमती नियंत्रित राहण्यास मदत होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.