बस मधून महिलांचे दागिने लांबवणारी यवतमाळच्या महिलांची टोळी पकडण्यास अमळनेर पोलिसांना यश
अमळनेर : विक्की जाधव.
धावत्या बस मधून ९ तोळे सोने लांबवणाऱ्या यवतमाळ येथील महिलांच्या टोळीचा सतत सात दिवस पाठलाग करून त्यांना पकडण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.
या संधर्भात अधिक माहिती अशी की. ६ रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील वय ४८ वर्षे रा गारखेडा ता धरणगाव ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगाव हुन जळगाव दोंडाईचा या बसमध्ये प्रवास करीत होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या. महिलेने आपल्या पिशवीतील पर्स मध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे समजले. त्यानंतर पैलाड नाक्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या एका बस मध्ये बसून परत जाताना दिसल्या. केदार बारबोले यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर ,हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशीव , प्रशांत पाटील , निलेश मोरे , उज्वलकुमार म्हस्के , महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांच्या पथकाला रवाना केले आणि आरोपीना पकडूनच आणा असे सक्त आदेश दिले. ज्या बसमधून चोरट्या महिला परत गेल्या ती बस जळगाव गेल्याचे समजताच पोलिसांनी जळगाव बसस्थानक गाठले. तेथील फुटेज तपासले असता त्या रिक्षातून निघून गेल्या. मागोवा घेत घेत फुटेज मधील महिला कुसुम्बा जळगाव येथे विमान तळच्या बाजूला बस्तान मांडून बसल्याची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाली. पोलीस तेथे पोहचेपर्यंत त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र जळगाव येथून त्या आपले गाठोडे बांधून भाड्याच्या गाडीत जाताना फुटेज मध्ये आढळल्या. पोलिसांनी त्या गाडी क्रमांकावरून शोध घेऊन माहिती काढली असता त्यांना अकोला येथे सोडण्यात आले होते. घरून निघालेल्या पोलिसांना माघारी फिरणे शक्य नव्हते. अंगावरील कपड्यांवर तसेच पुढे तपासाला निघाले. पोलिसांच्या दोन गाड्या अकोला पोहचल्या. त्या दरम्यान जळगावचे पोलिस पंकज खडसे , कुंदनसिंग बयस, गौरव पाटील , मिलिंद जाधव यांची तांत्रिक मदत घेतली. अकोला येथून त्या चोरट्या महिला बार्शी टाकळी पोहचल्या होत्या. पोलीस त्यांच्या मागोमाग गेले तर त्या परत अकोला आल्या होत्या. अकोला येथे पुन्हा फुटेज तपासले त्या महिला परतवाडा येथे गेल्याची माहिती मिळाली. परतवाडा येथे बसस्थानकाच्या पुढे त्या महिला एका चहाच्या हॉटेलवर चहा घेताना फुटेज मध्ये दिसून आल्या. तेथून एका रिक्षात निघून गेल्याचे दिसत होते. रिक्षा शोधणे मोठे जिकरीचे काम होते. रिक्षाचा वेगळे पणा पाहून पोलिसांनी साऱ्या रिक्षावाल्याना गोळा करून ही रिक्षा शोधून आणल्यास बक्षीस दिले जाईन असे आवाहन केले. अखेर मोठ्या बराच काळ उलटल्यावर रिक्षा सापडली त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याने त्या महिलांना महामार्गाच्या चौफुलीवर खाली उतरवून माघारी फिरला होता. तेथुन त्या महिला नेमक्या कोठे गेल्या याचा तपास लागत नव्हता. तांत्रिक माहितीने या महिला अंजनगाव येथे गेल्याचे समजले. पोलीस त्यांच्या मागावर होते परंतु त्यांच्यात दिवसाचे अंतर पडल्याने त्या तिगाव मार्गे पांडुरणा इंदौर पोहचल्या होत्या. इंदौर येथे पुन्हा फुटेज तपासले त्या महिला तिगाव ला परत आल्याची माहिती मिळाली. तेथून त्या वरुड जि अमरावती याठिकाणी पोहचल्याची माहिती प्राप्त झाली. एक दोन चार नव्हे तर तब्बल ३५० सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते. वरुड येथे त्यांना शोधण्यासाठी पोलीस भटकत होते. तांत्रिक मदतीने देखील नेमक्या कुठे याची माहिती मिळत नव्हती. एका मोठ्या झाडाच्या खाली सावलीत या महिला निवांत झोपलेल्या दिसल्या आणि पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. चोरट्या दोन महिलांसोबत त्यांच्या टोळीतील आणखी दोन महिला देखील त्यांच्यासोबत आढळून आल्या. चौघांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला आणले. महिलांकडून ९ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी दोन्ही महिलांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.