महाकुंभ जाणाऱ्या बोलेरो कारचा भीषण अपघात : १० भाविकांचा मृत्यू !
मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर भीषण अपघात…
मार्मिक समाचार | १५ फेब्रुवारी २०२५
देशात सध्या महाकुंभाचे आयोजन करण्यात आल्याने जगभरातील अनेक भाविक उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जात आहे. मात्र महामार्गावर अपघाताच्या देखील मालिकेत वाढ होत असून नुकतेच महाकुंभसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंच्या बोलेरो कारची बस बरोबर टक्कर झाली. या भीषण अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रयागराज-मिर्झापूर हायवे वर हा भीषण अपघात झाला. बोलेरो छत्तीसगढ येथून प्रयागराज येथे महाकुंभसाठी चाललेली. बस महाकुंभवरुन वाराणसीच्या दिशेने जात होती. अपघातानंतर घटनास्थळी मन सुन्न करणारं दृश्य होतं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातात 19 भाविक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो कारमधील सर्व 10 भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बसमधील 19 प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि बोलेरो कारची आमने-सामने टक्कर झाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात इतका भीषण होता की, टक्कर झाल्यानंतर बोलेरो कारचा चेंदामेंदा झाला. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप कष्ट करावे लागले.
छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील भाविक बोलेरो कारने संगमावर स्नान करण्यासाठी प्रयागराज महाकुंभ येथे निघाले होते. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बोलोरे प्रयागराज-मिर्जापुर हायवे वरील पुरा गावाजवळ पोहोचली. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बस बरोबर टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, हा आवाज खूप दूरवरपर्यंत ऐकू आला. अपघातानंतर बोलेरो कारची अवस्था खूप वाईट होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच भिती, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर बोलोरे कारचा चेंदामेंदा झालेला. त्यात लोक अडकलेले. पोलिसांनी लगेच जेसीबी मागवून घेतला आणि लोकांना बाहेर काढलं. बोलेरो कारमधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील 19 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रामनगरच्या सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. बसमधील भाविक मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महाकुंभवरुन ते वाराणसीला जात होते. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
निलंबित महिला पोलिस कर्मचारीचा मित्र अखेर ताब्यात
जळगाव : सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या निलंबित महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटील हिचा मित्र मिरखा नुरखा तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत निलंबित महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटील हिने फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हे दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेतले.
अर्चना पाटील ही ठाणे पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी मुंबई महापालिकेत काम करायची. तेथे मिरखा नुरखा तडवी हादेखील कामाला होता व तेथे दोघांची ओळख झाली. त्यानंतर अर्चना पाटील पोलिस दलात दाखल झाल्यानंतर जळगावला बदली झाली तरी तडवी व तिची मैत्री कायम आहे. फसवणूक प्रकरणातही तडवीविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याच्या खात्यावर काही रक्कम स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे
जळगावात दोन दुचाकींची धडक : एक जखमी !
जळगाव : दोन दुचाकींची धडक होऊन ठाकूरदास छुगोमल प्यारप्याणी (५१, रा. सिंधी कॉलनी) हे जखमी झाले. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरदास प्यारप्यानी हे मोहित सत्यपाल प्यारप्यानी (२३) याच्यासोबत दुचाकीने (क्र. एमएच १९ ईजे ९९३४) जात होते. त्यावेळी ही दुचाकी समोरील दुचाकीवर धडकली. यात ठाकूरदास प्यारप्यानी हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी १३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुडको परिसरात घरात लागली आग : घरातील साहित्य जळून खाक…
जळगाव : किचनमधील विजेच्या बोर्डामध्ये शॉर्टसर्किट होऊन फ्रीजला आग लागण्यासह ती घरात पसरल्याने मुलांचे जन्मदाखले, आधारकार्ड व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शिवाजीनगर हुडको परिसरात १३ फेब्रुवारी रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगरमध्ये फरिदाबी बाकरअली सैयद (५५, रा. शिवाजीनगर हुडको) यांच्या घरामध्ये शेख अफसर शेख (३५) हे भाडेकरू राहतात. ते बाहेर असल्याने त्यांचे घर बंद होते. त्यावेळी घरमालकांना घरातून अचानक धूर येताना दिसला. त्यांनी शेजारील मंडळींना बोलावून घराचा दरवाजा तोडून पाहिले असता शॉर्टसर्किटमुळे फ्रीजला आग लागलेली होती. स्थानिक नागरिकांनी आग विझविली. मात्र तोपर्यंत वाशिंग मशिन, लाकडी कपाट, मिक्सर, गादी, चादरी, पॅन कार्ड, आधार कार्ड, मुलांचे जन्म दाखले अशी महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती.
भाडेकरुच्या घरातून धूर निघत असल्याचे घरमालकाच्या लक्षात आले त्या वेळी ही घटना समोर आली. आगीत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोकों शशिकांत पाटील करीत आहेत. संसारोपयोगी साहित्य जळाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला काळिमा : प्रियकराचा थरार, प्रेयसीचा खून करून घरात पुरला मृतदेह !
मार्मिक समाचार | १५ फेब्रुवारी २०२५
प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा खळबळजनक प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणातील संशयित प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोनिका सुमित निर्मळ (३०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख इरफान शेख पाशा (३५) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. पतीपासून विभक्त राहणारी मोनिका ही जालना येथे माहेरी आईसोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगरला अपडाऊन करत होती. ६ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही. तिचा मोबाईलही लागत नव्हता, त्यामुळे चिंतातुर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केले आहे. आता मी तुम्हाला एक वर्षानंतरच भेटायला येईन, अशा आशयाचा खोटा मेसेज आला. या मोबाईलवरवर फोन केला असता तो पुन्हा लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली. नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन याप्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी कदीम जालना पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपासचक्रे गतीने फिरली.
इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही ६ फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासूर येथे गेली होती. लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता. शेतात असलेल्या पडीक घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचे सांगितले होते. दरम्यान, कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले आहे. दरम्यान, इरफानने मोनिकाने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव खोटा असून त्यानेच फाशी देऊन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा, असा अंदाज आहे.
असे जुळले प्रेमसंबध !
संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करत असे. दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणारा शेख इरफान शेख पाशा (३५) हे चांगलेच परिचित होते. त्यातून ते एकमेकांशी बोलायचे. दररोजच्या भेटीमुळे या दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचा अंदाज आहे.पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा (रा. लासूर स्टेशन) यास ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना येथे आणून चौकशी केली होती. मात्र, त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते. आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्ससोबतच लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज काढून ते तपासले होते. मोनिका हिच्यासोबतचे तासन्तास केलेले मोबाईल संभाषण आणि ६ फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अखेर तोंड उघडले.
बालविवाहातून पीडित मुलगी गरोदर !
यावल :पीडित मुलगी १४ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह यावल तालुक्यात राहणाऱ्या एका मुलासोबत लावून दिला. त्यानंतर ही मुलगी १६ वर्षांची असतानाच गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी पतीसह तिच्या नातेवाईकांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सांगली जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा दोन वर्षांपूर्वी १४ वर्षे वय असताना तिच्या आई-वडिलांनी यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलासोबत विवाह लावून दिला होता. ही मुलगी अल्पवयीन असताना गर्भवती राहिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो यावल तालुक्यात वर्ग केला आहे. या प्रकरणात पीडित मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि आई यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत एक गंभीर जखमी !
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील श्रीकृष्णा लॉन समोर रिक्षाची वाट पाहत असतांना अज्ञात दुचाकीस्वाराने ४८ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक देवून गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर हुडको भागात देविदास भगवान साबळे (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ते मुलगा प्रशांत साबळे यांच्यासोबत बॅण्ड वाजंत्री वाजवून ते आपला उदरनिर्वाह करतात. १२ फेब्रुवारी रोजी देविदास साबळे व त्यांचा मुलगा प्रशांत साबळे हे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे वाजंत्री वाजविण्यासाठी गेले होते. लग्नातील कार्यक्रम आटोपल्यानंतर देविदास साबळे व त्यांचा मुलगा प्रशांत हे शिरसोली गावातील श्रीकृष्ण लॉन्स जवळ रात्री ९.३० वाजता रिक्षाची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईबी ४८४७) वरील दुचाकीस्वाराने वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्यावर उभे असलेले देविदास साबळे यांना जोरदार धडक दिली.