भक्तिमय वातावरणासाठी कठोर पावले – वारी मार्गावर मद्य-मांस विक्री बंद
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारी मार्गावरील पवित्रता आणि भक्तिभाव अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून वारी मार्गावरील सर्व गावांमध्ये मद्य आणि मांस विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यात आली आहे.
संतांच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असून, लाखो भाविक सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार किंवा गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. वारी काळात पंढरपूर परिसरात व्हीआयपी वाहनांना ‘नो एंट्री’ देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे खासगी, शासकीय किंवा व्हीआयपी वाहन वारी मार्गावरून जाताना अडथळा ठरू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने वारकरी संप्रदायाच्या भावना लक्षात घेऊन हे निर्णय घेतले असून, नागरिकांनी व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“वारी ही भक्तीचा महोत्सव आहे, त्यात कोणतीही अशुद्धता नको”, अशी भावना या निर्णयामागे आहे.