अखेर संयमाचा बांध फुटलाच !
बाळासाहेब मला माफ करा !!
आजवर गेली अडिच वर्षे मी लेखणीची तलवार करून मिंधेंच्या गद्दारी विरोधात तुटून पडलो परंतू माझ्या लेखणीची धार बोथट झाली नाही.
सद्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अतिशय बिकट व विचित्र पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे. असंख्य निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत, अन्याय व अवहेलना सहन करीत निष्ठेने कार्यरत आहेत.
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम व निष्ठा यामुळेच तत्कालीन शिवसैनिक अवहेलना व प्रतारणा सहन करीत आहेत.उपरे व आयात केलेले त्यांच्या उरावर बसवले जात आहेत. बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाला जागून निष्ठावंत शिवसैनिक तग धरून आहे. कट्टर शिवसैनिकांची पिढी अस्तंगत होत चालली आहे. त्यामुळे खरे निष्ठावंत देखील लोप पावत चालले आहेत. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे अनुक्रमे बाळासाहेबांचे सुपुत्र व नातु म्हणून त्यांचे नेतृत्व अशा शिव सैनिकांनी स्विकारले आहे.
सद्या जे पक्षात येत आहेत वा टिकून आहेत त्यातील बहुतांश फक्त पदं आहेत व तिकिट मिळावे यासाठीच आहेत.कट्टर शिवसैनिक अडगळीत टाकले जात आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर विरोधक म्हणतात तशी शिल्लक सेना ठरणार आहे. मी गेल्या अडिच वर्षात जे जहाल व घणाघाती लेखन केले ते जीवाची जोखीम घेऊनच.कारण एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात राहून त्यांना उघड आव्हान देणे महाकठीण काम होते. मी आमिषांना बळी न पडता ते काम निष्ठेने केले.परंतू माझी कदर केली जात नाही. म्हणण्याला किंमत दिली जात नाही.साधी भेट मागितली तरी ती सहा महिन्यात सहा मिनिटांसाठी भेट मिळत नाही.
बाळासाहेबांच्या व दिघे साहेबांच्या काळात सामान्य शिवसैनिकांना जो मान सन्मान होता त्याचा लवलेशही उरलेला नाही. बाळासाहेब शिवसैनिकांना कवचकुंडले मानीत आता शिवसैनिक मतदानात प्रचारापुरतेच वापरून फेकले जातात.इथे किंमत आहे पैसेवाले धनाढ्य लोक व महागड्या कारवाल्यांना. हे किती दिवस चालणार ? “ज्यांना जायचे त्यांनी जावे मी अडवणार नाही,” हे धोरण बेरजेचे कि आतबट्याचे ? आजवर जे गेले ते काही सर्वच गद्दार नव्हते. पक्षाकडून झालेले दुर्लक्ष, संकटात एकाकी पाडणे, अपमानास्पद वागणूक, वेळेवर भेट न मिळणे यासारखी अनेक कारणे आहेत.”उद्धव साहेबांभोवतीचे बडवे हेच या दुरावस्थेला कारणीभूत आहेत.” आर्थिक गैरव्यवहाराचे जाहिर आरोप होऊनही या नेत्यांना दूर ठेवले जात नाही.त्यामुळे ही गळती लागली आहे.लाखो टन पाण्याची टाकीही काही कालावधीत गळतीमुळे रिकामी होते. आजवर किती तरी निष्ठावंत याच कारणांमुळे गेले.राजन साळवी, भास्कर जाधव उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. एकट्या विनायक राऊतांमुळे ठाणे व कोंकण रिकामा झाला. ज्यांना जायचे त्यांनी जावे आम्ही उरलेल्यांबरोबर पक्ष चालवू असे म्हणणे आत्मघातकी आहे. या उलट बाळासाहेब म्हणत – “पाखरांनो परत फिरा रे !”
रावणाचा पराभव झाला व राम जिंकले त्याचे मुख्य कारण रावणाचा भाऊ रामांबरोबर होता व रावणाची गुपितं तो रामाला सांगत होता म्हणून बलाढ्य व शक्तिशाली रावण पराभूत झाला, या पासून आपण काही बोध घेणार की जे जातात त्यांना जाऊ दे ! असे म्हणणार ?
राजूल पटेल सारखे कट्टर जे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईपर्यंत चप्पल घालणार नाही ! म्हणत सात वर्षे अनवाणी फिरतात त्यांना शिवसेना सोडावी लागते ! राजन साळवी सारखे कोकणातील कट्टर शिवसेना नेते निव्वळ विनायक राऊतांच्या कपटनीति कंटाळून पक्ष त्यागाच्या निर्णयाप्रत जातात तरी आम्ही म्हणणार “जे जातात ते जाऊ देत आम्हाला फरक पडत नाही ?” याच्याने पक्ष वाढ खुंटेल; कारण जी बांडगुळं तिकिट व पदाच्या लालसेने आपल्या पक्षात सद्या आहेत ते स्थलांतरित पक्षी आहेत.सुगीचे वा स्वार्थाचे दिवस संपले की ते उडून जातील. आज जी शिवसेना शिल्लक आहे ती बाळासाहेब ठाकरेंवरील निष्ठेमुळेच. ! ही पिढी संपली की असे निष्ठावंत शोधूनही सापडणार नाहीत.
शेवटी कठोरपणे लिहावे लागले.किती दिवस लेखणीवर अंकुश ठेवणार ? मी हे मनानर दगड ठेऊन लिहित आहे कारण संयमाचा कडेलोट झाला आहे. हे लिहिण्याचे धाडस कट्टर शिवसैनिकच करू शकतो.काठावरील लोकांना शिवसेना तरली काय आणि बुडाली काय काहीही फरक पडत नाही. तरी मला गद्दार ठरवून तुम्ही हकालपट्टी करू शकता. मी काही शिवसेना (बाळासाहेबांची ) सोडणार नाही किंवा कोणत्याही सेनेत जाणार नाही. हे मात्र नक्की ! अजून ब-याच बाबी लिहिता येतील परंतू झाकली मुठ सव्वा लाखाची अशी मनाची समजूत घालत येथेच थांबत आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक
उल्हासनगर
९८२२९०२४७०