करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून जागा वाटप अंतीम टप्प्यात आलेले असल्याने करमाळयातील जागेसाठी शिवसेना भाजपामध्ये रस्सीखेच चालू असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आपापल्या परीने मुंबई येथील पक्ष कार्यालयात नेत्यांच्या गाठीभेटी घेवून करमाळयाची जागा आपल्याच पक्षाला कशी मिळेल याबाबत संघर्ष करताना पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या वतीने माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी जाहीर करून नामनिर्देशन पत्र भरून दिलेले असताना महायुतीचे घोंगडे मात्र अद्याप भिजतच राहिलेले आहे.
महायुतीमध्ये फॉर्म्युलानुसार ज्या ठिकाणी विद्यमान आमदार असेल त्या ठिकाणची जागा त्या त्या पक्षाला देण्याचे ठरलेले आहे. त्यामध्ये करमाळयातील जागा अपक्ष आमदार परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संजयमामा शिंदे यांना दिली जाणार असे बोलले जात असतानाच स्वत: आमदार शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील होण्याच्या आगोदरआघाडीमध्ये असताना करमाळयाची जागा ही पारंपारीक पध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस घडयाळ या चिन्हावरच लढवित आलेली होती. परंतु आमदार शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर करताच शिवसेनेने करमाळा मतदार संघावर दावा करीत युतीमध्ये करमाळयाची जागा शिवसेनेने धनुष्यबाणावर आजपर्यंत लढवलेली असल्याने जागा मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
वास्तविक पाहता, आमदार शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर करमाळयातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पदाधिकाऱ्यांनी दुसरा उमेदवार देणे अपेक्षित होते अथवा सदरची जागा आपल्याच पक्षाकडे कशी राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. तसेच करमाळयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वरिष्ठ पातळीवर जागा मिळवण्यासाठी हालचाली करताना पाहायला मिळेल असे वाटत असताना करमाळयातील अजित पवार गटातील एकाही पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षाला जागा मिळावी म्हणून आवाक्षरही काढलेले दिसत नाही अथवा नेत्यांकडे आग्रह केलेला दिसत नाही. त्यामुळे भविष्यात करमाळयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अस्तित्व कितपत टिकून राहील याबाबत विविध ठिकाणी चर्चा पहायला मिळत आहेत. पक्ष वाढीच्या दृष्टीने पदाधिकारी यांनी एकमुखी मागणी करणे आवश्यक असताना पदाधिकारी शांत का आहेत हा प्रश्न सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे. सध्या सुरू असलेल्या विधानसभा रणधुमाळीत करमाळयाची जागा शिवसेनेला सुटते कि, भाजपाला सुटते यावरच करमाळयाच्या राजकारणाची पुढील गणिते अवलंबून आहेत हे मात्र नक्की.