देशाचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी संसदेत नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्प अव्यवहारी असल्याचं सांगत संबंधित प्रकल्प रद्द केल्याचं सांगितले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
महाराष्ट्रात सध्या नारपार नदीजोड प्रकल्पावरुन रान पेटताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी दररोज वेगवेगळ्या भागात आंदोलन होताना दिसत आहे. संसदेत खासदार भास्कर भगरे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी नारपार संबंधित विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशाचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी संसदेत नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्प अव्यवहारी असल्याचं सांगत संबंधित प्रकल्प रद्द केल्याचं सांगितले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. सी. आर. पाटील यांच्या वक्तव्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात काही सामाजिक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. ही आंदोलने पाहिल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत नवी माहिती दिली. नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्प रद्द झाला नसून राज्यपालांच्या स्वाक्षरीने मंजूर झाला असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेत मोदींसमोर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं.
दरम्यान, नारपार खोऱ्यातील 52 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात जाणार आहे अशी चर्चा आहे. तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी डीपीआरही तयार करुन घेतले असं चर्चेत आहे. डीपीआर म्हणजे प्रकल्पाचा आराखडा. हे सर्व असताना महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नारपारच्या खोऱ्यातील गुजरात सरकार जे पाणी घेऊन जाणार त्यावर प्रचंड रोष आहे. पाणी आपल्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला, अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे. गुजरात सरकार सरासरी 100 टीएमसी नारपारच्या खोऱ्यातील पाणी घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. तसा त्यांनी या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प असं गोंडस नाव दिलं असून 1 लाख कोटींच्या रुपयांच्या निधीच्या तरतुदीच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. या सर्व बाबतीत आपले राज्य सरकार आणि खान्देशातील मंत्र्यांची विशेष:ताह मंत्री अनिल पाटील यांची उदासीनता दिसून येते.
गुजरातमध्ये दोन महाकाय धरणे असूनही महाराष्ट्राचं पाणी का हवं?
गुजरातमध्ये उकाई धरण हे 200 टीएमसी पेक्षा जास्त क्षमतेचे आहे, तर सरदार सरोवर हे 280 टीएमसी पाणी क्षमतेचं आहे. तरीही महाराष्ट्राच्या पाण्यावर त्यांचा डोळा का? कारण गुजरातला हे पाणी कच्छ आणि भुजमधील वाळवंटाला नंदनवन करायचं आहे. तसेच अहमदाबाद आणि भरुच या दोन शहरांच्या मध्यभागी मुंबईला तोडीस तोड असं डोलारा नावाचं आर्थिक शहर उभारायचं आहे, अशी चर्चा आहे. त्यासाठी गुजरात सरकारला नार-पारच्या खोऱ्यातील पाणी हवं आहे.