June 29, 2025 8:09 am

धंदा एकेकाचा….

अपनी भाषा में पढ़े! Translate

धंदा एकेकाचा….
पोट भरण्यासाठी नोकरी व व्यवसाय करावा लागतो.तो प्रत्येक जण करीतच असतो.मी आठवत गेलो कोण काय काय धंदे करून आपले पोट भरतात ?
स्मशानात सरणाची लाकडं विकणारापण धंदा करतो. स्मशानात आलेलं प्रेत व त्याला घेऊन आलेले नातेवाईक हे त्याच्या दृष्टीने गि-हाईकच असतात. त्यांना पाहून तो साहजिकच सुखावत असेल. चला आजचा धंदा मिळाला.आणि समजा एखाद्या दिवशी एक ही प्रेत स्मशानात अंत्यविधीसाठी आले नाही तर तो विन्मुख होऊन बसत असेल, मनात तरी म्हणतच असेल, आज साला गि-हाईकच आले नाही. या धंद्यात बेईमानी करणारेही असतात.सरणाच्या लाकडांवर पाणी मारून वा मुद्दाम भीजत ठेऊन वजन वाढवणारेही असतात.कधी कधी वाटतं ते मापातही पाप करीत असतील.कारण मी तरी स्मशानात दगडांचीच वजन मापं पाहत आलो आहे.
याच्याच जोडीला अजून एक दोन धंदे असतात. प्रेत जाळणारा, पुरणारा यांचाही तो धंदा असतो.तो प्रेत जाळण्याचे पैसे घेतो तो त्याचा हक्कच असतो कारण तो “सेवा” देत असतो.पण त्यातही लाच हा प्रकार येतो. ठराविक रकमेच्यावर जेंव्हा तो खर्ची/चहापाणी मागतो, तेव्हा आश्चर्य वाटत नाही, कारण तोही या लौकिक जगातूनच आलेला असतो. उल्हासनगरच्या स्मशान भूमीत महापालिकेने लाकडं मोफत योजना सुरू केली आहे. किती हे औदार्य ? जीवंत माणसांना सोयी सुविधांपासून वंचित ठेवायचे त्यांच्या कष्टाच्या पैश्यांवर डल्ला मारायचा आणि मेल्या वर म्हणे लाकडं मोफत. त्यामुळे जीवंत नागरीकांपेक्षा मेलेले भाग्यवान म्हणाल तर तेही भाग्य नाही. चारशे रूपयांची पावती फाडून 1400 रूपये घेतले जातात. महापालिका पगार देत नाही ट्रस्टी अल्प मानधन (?) देत असतील तर प्रेतं जाळून घरची चूल पेटवायला हे कृत्य करायला महापालिकाच भाग पाडते, असे मला ठामपणे वाटते.ज्यांना हा भ्रष्टाचार वाटतो ते मात्र शासकीय व महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल ब्र काढतील तर वरच्या पितरांचा कोप होईल की काय असे मूग गिळून गप्प बसतात.
या स्मशानात एक मोठा धंदा करणारी असामी अजून शिल्लक आहे .अहो, कोण म्हणजे आपले पुरोहित बुवा !! त्यांच्या शिवाय मृतात्म्यांना शांती कशी लाभेल ? कर्मकांड करायला स्पेशालिस्ट पुरोहित लागतात, शुभ कार्य करणारे भटजी असे कार्य करीत नसत पण आता भटजींचे शाॅर्टेज असल्याने ऑल इन वन भटजी ही आहेत. तोही त्यांचा धंदाच असल्याने तेही गि-हाईकाची वाट पाहत असतीलच, आणि त्यात काय वाईट (?) कारण ते सर्विस देतात.अर्थशास्त्रात एक नियम आहे.स्केअरसिटीचा.तो यांना नेमका लागू होतो. जेव्हा एखादी वस्तू दुर्मिळ असते तेंव्हा त्याची किंमत वाढते व या उलट.या ठिकाणी कर्मकांड करणा-या पुरोहित/ब्राम्हणांची कमतरता ( shortage) असल्याने त्यांचेही भाव वधारलेले आहेत.आणि ते आपले दाम पुरेपुर वसूल करतात आणि गरजवंत नातेवाईक (मृताचे) गुमानपणे कोणतीही बार्गेनिंग ( घासाघीस) न करता ते मागितली तितके पैसे देतात, कारण – नाहीतर मृतात्म्याला शांती मिळणार नाही ? ही रिस्क कोण घेईल ?
या मृतात्म्यामुळे कार्याचे जेवण बनवणा-या आचा-यासही वा कॅटरर्सलाही व्यवसाय मिळतो. कारण घरी जेवण बनविण्याची पद्धत केंव्हाच बाद झाली.
एकत्र कुटुंब पद्धती होती तेंव्हा ही पद्धत अस्तित्वात नव्हती. एक मरणारा माणूस ही जाता जाता किती लोकांचे भले करतो, व्यवसायाचे कारण बनतो, हे लक्षात यावे म्हणून हा लेखन प्रपंच.
आता जीवंत माणसांचे व्यवसाय ही पाहूया. काही लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किती मुक्या प्राण्यांच्या हत्या खाटीक करतो ? बोकड, कोंबड्या, विशिष्ट लोकांचे खाद्य असलेले डुक्कर,कबुतर, ससे अशा किती तरी मुक्या प्राण्यांची हत्या करून खाटीक आपले पोट भरत असतो.हा त्याचा व्यवसायच असल्याने त्याला काहीच वाटत नाही.जत्रेत नवस फेडण्यासाठी दिले जाणारे प्राण्यांचे बळी यामुळे ही अनेकांना रोजगार मिळतो.देव देवतांच्या नावाने दिलेले बळी अखेर माणसंच फस्त करतात पण नांव देवाचं.असे बळी देऊन वा मनोकामनापूर्ण होण्यासाठी बळी द्यावे लागणे ही तर निव्वळ अंधश्रद्धाच.पण ही अंधश्रद्धा पसरविणारे बुवा, बाबा, तांत्रिक, मांत्रिक ही त्यांचा धंदा चोखपणे करीत असतात.
आता दुसरा मुद्दा घेऊया.खाबुगिरी हा शब्द सरकारी बाबू वरूनच निष्पन्न झाला असावा, अशी परिस्थिती आहे. शासकीय काम हात ओले केल्या शिवाय होतच नाही, हे जणू समीकरणच झाले आहे.शासनाकडून गलेलठ्ठ वेतन व सोयी सुविधा घेणारे नागरीकांची अडवणूक म्हणजेच त्यांच्या अडीअडचणी वाढवून त्यातून मार्ग काढण्यासाठी व कृपावंत होण्यासाठी जी लाच घेतात तो त्यांचा विशेष सेवेचा व कृपादृष्टीचा चार्ज असतो व तो आकारणे हा त्यांचा अधिकारच आहे, अशा तो-यात ते वावरतात.हा त्यांचा मेन बिझीनेस असतो व नोकरी साईड इनकम…आत्ता बोला ! पुर्वी तर थोडीफार लाज शिल्लक असल्याने टेबलाखालुन व्यवहार चाले आता तर खुल्लमखुल्ला व्यवहार चालतो.जणू काही भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असून त्याला राजमान्यता मिळाली आहे, असे वातावरण आहे.
असे अनेक धंदे आहेत.त्यावर लिहायचे तर एक प्रबंधच होईल.पण मला डाॅक्टर व्हायची हौस नाही, म्हणून मी त्या फंदात पडणार नाही.अहो एखाद लाख दिले की 10 वीत काठावर पास झालेले डाॅक्टर ( डाॅक्टरेट) कमी आहेत का ? पण आता वैद्यकीय व्यवसायातील डाॅक्टरांना साईड बिझीनेस मुळेच जास्त इनकम मिळते व तेही टॅक्स फ्री व कॅशमधे. हा बिझीनेस म्हणजे कट प्रॅक्टीस. एखाद्या पेशंटला मोठ्या विशिष्ठ हाॅस्पिटलमधेच रेकमंड ( शिफारस) करण्यामागे कमिशन मिळवणे हा बहुतांश वेळा उद्देश असतो. स्वतःच्याच मेडिकल स्टोअरमधूनच किंवा विशिष्ट मेडिकल स्टोअर मधुनच औषधं घेण्यास भाग पाडणे, हा ब-याच डाॅक्टरांचा साईड बिझनेस उघडपणे चालतो.अनावश्यक चाचण्या ( टेस्ट ) करावयास भाग पाडणे, त्यासाठी स्वतःच्या वा विशिष्ट लॅब मधुन टेस्ट करावयास लावणे यामागे बहुतांश वेळा कमिशनरूपी साईड इनकम हा उदात्त (?) हेतू असतो. पेशंटला घाबरवून सोडून अनावश्यक शस्रक्रिया ( ऑपरेशन्स) करायला भाग पाडण्यामागे आपल्या वैद्यकीय शिक्षण व नंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवलेली रक्कम वा कर्जाचे हप्ते फेडता यावेत हा उदात्त हेतू असतो.महिलांचे सिजरिंग, ब्लाॅकेजच्या नांवे एन्जोग्राफि, एन्जोप्लास्टी किंवा शेवटी बायपास सर्जरी ही बहुतांश वेळा अनावश्यक असताना पेशंटला व त्याच्या नातेवाईकांना घाबरवून केली जाते. हा ही एक धंदा तेजीत आहे.
आता एक राजमान्य धंदा सांगायलाच हवा. नाहीतर दिलीप मालवणकरचा लेख पूर्ण होईलच कसा ? पुर्वी राजकारण हे उदात्त हेतूने समाजहितासाठी व समाजसेवेच्या समर्पित भावनेने केले जात असे.लाल बहादूर शास्त्री, पी.जी.मावळंकर, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते व आताच्या काळात मनोहर पर्रिकर, राम कापसे, यासारखे अनेक राजकारणी आदर्श मानले जातात.पण आता गेले ते दिन गेले.आता राजकारण हा एक मोठा धंदा झाला आहे. विविध पक्ष, संघटना एखादा काॅर्पोरेट व्यवसाय थाटावा अशा पध्दतीने दुकानं थाटून बसली आहेत. सर्व विधीनिषेध गुंडाळून इतकेच नव्हे तर कमरेचेही सोडून ( आपली तत्व, निष्ठा, न्याय्य धोरणं, नीतिमत्ता) राजकारणाचा धंदा सुरू आहे. भ्रष्टाचार करून, घोटाळे करून अफाट पैसा कमवायचा व निवडणूकीच्या तोंडावर त्यातले काही तुकडे मतदारांच्या तोंडावर फेकायचे व पुन्हा पुन्हा निवडून येऊन पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार करणे यालाच लोकमान्यता व राजमान्यता म्हटले जाऊ लागले आहे. या धंद्यात पैसे लोकांचे व श्रेय मात्र लोकप्रतिनिधी उमटतात.
अमक्याचा नगरसेवक निधी, आमदार निधी, खासदार निधीतून काम झाल्याची फुशारकी मारली जाते.अरे बाबांनो, हा निधी शासनाने आपल्या मतदार संघासाठी मंजूर केला इतकेच.आणि या विकास कामासाठी दिलेल्या निधीतून टक्केवारी न घेणारे लोकप्रतिनिधी किती असतील ? दुर्बीण लावुन शोधावे लागतील. देशाच्या संरक्षणासाठी घेतलेल्या युद्ध सामुग्रीतही भ्रष्टाचार, कोळश्याच्या, पेट्रोलियम, खाणीतही भ्रष्टाचार होत असेल तर शिल्लक राहतेच काय ? आमच्या महापालिकेत तर प्रवेशद्वारांचे पेव फुटले आहे. 13.4 चौरस कि.मी.क्षेत्रफळच्या इवल्याश्या महापालिकेत प्रवेशद्वारांचा सुळसुळाट झाला आहे. जीवंतपणी आपल्या आई वडिलांचे हाल करणारे महापालिकेच्या निधीतून आई, बाप, पत्नी आदींच्या नांवे प्रवेशद्वार उभारून मोकळे झाले आहेत. अरे बाबांनो तुमच्या जन्मदात्यांचे स्मारक उभारायचे तर स्वतःच्या पैश्याने उभाराना ? तुमचे आई, बाप, पत्नी आहेत त्यांच्याबद्दल निश्चितपणे सार्थ अभिमान बाळगा, स्मारकंही उभारा पण ते स्वतःच्या पैश्याने ! तुम्हाला जन्माला घातले हे शहरवासीयांवर परोपकार केले का ? या शिवाय शहर, राज्य व देशासाठी काही अमूल्य योगदान नसेल तर का म्हणून जनतेचा पैसा उधळता. प्रवेशद्वारं उभारण्याची खरोखरच गरज आहे का ? आणि त्यावर नगरसेवकांचे ठळक नांव कशाला, त्याने एक पैसा तरी योगदान दिले आहे का ? चोपडा कोर्ट परिसरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार पाहण्यात आले, त्यावर अपात्र ठरलेल्या नगरसेवकाचे झालरसदृश्य नांव आहे. हा बाबासाहेबांचा सन्मान कि अवमान ? एका छोट्याश्या शहरात हे बोर्डर युद्ध का पोसले जात आहे ? धंदा,धंदा आणि फक्त धंदा यालाच राजकारणाचे लेबल लावले आहे.
गेल्या दोन वर्षात इडी, सीबीआय व आयटीची भीती दाखवून पक्ष फोडण्याचा धंदा तेजीत आहे.दशकानुदशके ज्या पक्षाने पोसले त्याचा विसर पडून हे माजलेले बैल स्वहितरक्षणासाठी रातोरात दाखल होतोत व पितृपक्षावर तंगड्यावर करून दुगुण्या झाडतात. त्या बदल्यात खोके, मंत्रीपद, राज्यसभेवर वर्णी अशी बक्कळ कमाई मिळवून देणारा बाजार बसव्यांप्रमाणे धंदा करणारे राजकारणीही कमी नाहीत. भ्रष्टाचार करा, भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये जाऊन स्वच्छ होणेहा देखील व्यवसाय जोरात आहे.
ज्या न्यायपालिकेला लोकशाहीचा स्तंभ महत्वाचा स्तंभ मानले जाते ती न्यायपालिकाही राज्यकर्त्यांच्या हातचे बाहुले होते, याची अनेक उदाहरणं हल्ली दिसतात. न्याय विकणे हा देखील एक व्यवसाय होऊ पाहत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी न्यायालयांच्या भिंतींवर न्यायाधिशांचे दर लिहून २५ वर्षांपुर्वी खळबळ माजवून दिली होती.
असे धंद्याचे अनेक पैलू आहेत. न संपणारी ही यादी आहे. किती सांगू आणि किती शिल्लक ठेवु.पण लेखनसीमा संपली.आता येथेच थांबतो.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!