करमाळा प्रतिनिधी :- आजमितीला व गेल्या काही वर्षांपासून करमाळा शहराची(आता शहर नव्हे तर बकाल,घाणेरडं भुक्कड गाव म्हणणं योग्य ठरेल) व्यवस्था व अवस्था पाहिली तर या शहरात नगरपालिका/नगरपरिषद नावाची संस्था हयात आहे की तिचा दफनविधी झालाय?असंच म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आलेली आहे.आजकाल
“अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?”असं एक वाक्य राजकारण्यांकडून प्रचलित झालंय.त्याचं धर्तीवर करमाळ्याच्या भंगार पालिकेला उद्देशून आता असं म्हणायची वेळ आलीय की,” एके काळी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या, आखीव-रेखीव,नेटनेटके स्वच्छ शहर ” अशी ख्याती असलेल्या या शहराला केवळ तुमच्या निर्लज्ज, निर्ढावलेल्या,भ्रष्ट,गल्लाभरू कारभारामुळे इतकी अवकळा आलीय की बाहेरगावचे पै-पाव्हणे जेव्हा करमाळ्यात येतात ना त्यावेळी,तुम्ही असल्या घाणेरड्या,भंगार गावात रहाताच कसे?असं विचारून काढता पाय घेतात.
पूर्वीच्या काळी १९६० पूर्वी पालिकेच्या सात नळाच्या विहिरीवरून(ही भव्य विहीर १९०७ साली बांधण्यात आली,या विहिरीची आज प्रचंड दुरवस्था आहे.हा ऐतिहासिक/हेरिटेज ठेवा जतन करण्याइतपत देखील अक्कल पालिकेला नाहीये.हे तर राहू द्याच…पण
किल्ल्याभोवतालचा खंदक बुजविणे,राजे रावरंभा यांची खाजगी नृत्यशाळा असलेली सरकारी दवाखान्याची ऐतिहासिक इमारत पाडणे,दोनशे वर्षे जुनी असलेल्या तालुक्यातील पहिल्या मराठी शाळेची मजबूत इमारत पाडून तिथं नवी इमारत बांधणे, किल्ल्यातील कारंजे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या निंबाळकर राजघराण्यातील स्त्रियांचे स्नानगृह असलेल्या आजही मजबूत पण दुरावस्थेत असलेल्या विहिरीच्या दर्शनी भागात समाजमंदिर बांधून ती आणखी दुर्लक्षित करणे अशी अनेक दुष्कर्म पालिकेने व त्या-त्यावेळच्या अक्कलशुन्य पदाधिकारी यांनी केलेली आहेत.)असो…
तर त्यावेळी हे पाणी सायफन पध्दतीने शहरात असलेल्या किल्ला(सध्याच्या नगरपरिषदे समोर),वेताळपेठेतील रामाचा हौद,मंगळवार पेठेतील सध्या महाराणा प्रताप पुतळ्याच्या जागी असलेल्या व दत्तपेठेतील जुन्या माळहाटी येथील (सध्या येथे पालिकेचे शॉपिंग सेंटर आहे) या चार हौदांमध्ये येत असे.विशेष म्हणजे हे चार हौद चौकोनी आकाराचे,सुबक दगडी बांधकाम व चोहोबाजूंनी दगडी कठडे बांधलेले व फारतर दहापंधरा फूट खोलीचे होते.(ही वारसास्थळे देखील पालिकेने नष्ट केली) तर त्याकाळी हौदात पाणी सुटले की आबाल-वृद्धाना, सासुरवाशी महिलांना रात्री-अपरात्री हौदात दोर बांधलेल्या बादल्या, घागरी,टमराळी सोडून पाणी शेंदावं लागत असे.तात्पर्य पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या त्या काळात “करमाळ अन पाण्यावाचून टमराळ !”अशी म्हण प्रचलित होती ज्यामुळं मुलींचे आई-बाप आपल्या लेकी करमाळ्यात द्यायला तयार नसायचे म्हणे.
१९६० साली संगोबा येथून पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली आणि या शहराचे पाण्याचे दुर्भिक्ष्य संपले व तिथून पुढे पोरींचे
आईबाप या सुंदर,टुमदार,शांत-आटोपशीर, सुरक्षित छोट्याशा शहरात आवर्जून आपल्या पोरीबाळी देऊ लागले.पण आता..? या शहराचे घाणेरडे,बकाल,
किळसवाणे रूप पाहून नांदायला आलेल्या पोरीसुद्धा नवऱ्याला म्हणायला लागल्यात,चला गाव सोडून…
न्हायतर माझी मी जाते माघारी! त्यामुळं बिनलग्नाच्या पोरांची लग्न तर जमायचा विषयच संपलाय…आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे गेल्या काही वर्षांपासून
ते पालिकेचे निष्क्रिय,भ्रष्ट प्रशासन व गल्लाभरू लोकप्रतिनिधी!(सध्या प्रशासकीय कारभार आहे) पण या एकेकाळी सुंदर,स्वच्छ अशी ओळख असलेल्या शहराचे रुपडं नासवण्यामध्ये गेल्या वीस-पंचवीस वर्षांमधील लोकप्रतिनिधी देखील कमीअधिक प्रमाणात तितकेच जबाबदार आहेत.
मूळ शहरातील अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूला असलेली उघडी व तुंबलेली गटारे,सर्वत्र असलेला मोकाट जनावरांचा उच्छाद व त्यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा,शहरातील मुख्य सुभाषचंद्र बोस चौकापासून ते सर्वत्र हातगाडीवाल्यांनी कायमस्वरूपी मांडलेले ठाण,बाजारपेठेतील दुकानदारानी दुकानासमोर केलेली अतिक्रमणे,अरुंद रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी असलेली दुचाकी,चारचाकी वाहने,शहर व परिसरात पालिकेच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत झालेली हजारो अतिक्रमणे,विनापरवाना ट्रिपलसीट बेफामपणे दुचाकी चालवणारी अल्पवयीन मुले व मुली,सर्वत्र साठलेले कचऱ्याचे ढीग,सर्वत्र असलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे, डासांच्या उपद्रवामुळे पसरणारी रोगराई,जागोजागी सतत होणारी वाहतुकीची कोंडी,करोडो रुपयांचा निधी खर्च करून वारंवार डाम्बरीकरण,काँक्रीटीकरण करून वरचेवर खराब होणारे रस्ते,रस्त्यांवरील खड्ड्यात साठणारे पाणी व अशा रस्त्यांवरून वाट काढणारी बेफाम वाहने व अशा रस्त्यांवरून जीव मुठीत धरून चालणारे पादचारी…अशी आजच्या करमाळ्याची दुरावस्था आहे.
यातील मुख्य गंमत अशी की वरचेवर रस्त्यांची केली जाणारी कामे ही अतिशय बिनडोक पद्धतीने,शास्त्रहीनपणे केली जात असल्याने दिवसेंदिवस
रस्त्यांची उंची वाढत चाललीय आणि घरे-इमारती खाली चाललेल्या आहेत.बहुदा पुढील शंभर वर्षात करमाळा शहराची अवस्था ही हडाप्पा-मोहोन्जदरो या शहरांसारखी होण्याची चिन्हे आहेत.(माझ्या मते ती शहरे अशीच जमिनीत गाडली गेली असावीत☺️)
पूर्वीचे लोकनियुक्त प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी हे देखील आजच्या तुलनेत बऱ्यापैकी निस्पृह वृत्तीने सामाजिक बांधीलकी जपणारे असायचे.मला आठवतंय अजूनही मधला काही कालखंड वगळता १९९६ पर्यंत जवळपास बावीस वर्षे नगराध्यक्ष असणारे कै. गिरधरदास देवी यांना शहरातील स्वछता आणि
नागरिकांच्या तक्रारी,अडीअडचणी पाहण्यासाठी व निवारणासाठी अनेकदा शहरातील रस्त्यांवरून पायी फिरायचे.१९७४-७५ साली पालिकेचे मुख्याधिकारी असलेले कै.रामराव ठोनगे-पाटील हे शहर स्वछता व स्वच्छता कामगारांवर निगराणी ठेवण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून सायकलवरून शहरात फिरायचे. त्याकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या दिमतीला चेनकव्हरवर” नगरसेवा हीच ईशसेवा”असं घोषवाक्य लिहिलेली पालिकेची सायकल असायची.
आणि आता…पालिका हे चराऊ कुरण आहे,त्यामुळं काहीही झालं तरी नगरसेवक व्हायचंच अशी आस लावून बसलेले महाभाग गल्लोगल्ली आढळून येतात.नव्वदच्या दशकापासून ‘ पैशाद्वारे सत्ता आणि सत्तेतून पैसा ‘ हे समीकरण रूढ झाल्याने साम-दाम(दंड करमाळ्यात चालत नाही) वापरून नगरसेवक होऊन मग दामचौपट,दहापट मिळवायचे एवढंच ध्येय समोर असलेले नग नगरसेवक होतात.बरं एकदा होऊन तल्लफ भागत नाही मग नंतर आरक्षण पडलं तर,आई,बायको,चुलती कुणाला तरी उभं करायचंच आणि मक्तेदारी कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा.लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाले त्यामुळं मतदार लालची झाले ही आपल्या लोकशाहीची आजची शोकांतिका आहे.
नगरसेवक व्हायचंच असा ध्यास घेतलेल्या एकाच घरातील तीन-तीन पिढया मी व तुम्ही करमाळ्यात पाहिल्या आहेत.अमोद संचेती,दीपक ओहोळ,पुष्पाताई फंड असे नगरसेवक व नगराध्यक्ष होऊन पुन्हा या फंदात न पडलेली व घराणेशाहीचा क्लेम न ठेवणारी काही निवडक उदाहरणं ही नियमाला अपवाद समजावी. लागतील. अधिकाऱ्यांची मानसिकता तर “गाव जळाला आणि हनुमान बाहेर!”अशीच असल्याचे दिसून येते.वास्तविक पाहता शहराची निगराणी करणं हे मुख्याधिकारी यांचं प्रथम कर्तव्य आहे पण त्याचप्रमाणे तहसीलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांनी देखील अधूनमधून शहरात फिरून अतिक्रमणे,वाहतुकीची समस्या आदी प्रश्नांची उकल करणं,कारवाया करणं हे त्यांचे कर्तव्य आहे. पण कुणी कुणाला सांगायचं?सगळे एकाच माळेचे मणी! या सगळ्यांची शासकीय कार्यालये व शासकीय निवासस्थाने गावाबाहेर, त्यामुळं हे अधिकारी कारणाशिवाय गावात फिरकतच नाहीत.उलट कुठं जायचं झालं तर वाहतूक कोंडीत अडकायला नको म्हणून बाहेरच्या रस्त्यांनी वा बायपास मार्गे जा-ये करतात.
अलीकडच्या काळात तर शहरातील रस्त्यांवर खड्डे खोदायला,मनाला वाटेल तिथे डिजिटल बोर्ड, कमानी उभ्या करायला, बांधकाम करायला पालिकेची परवानगी घ्यावी लागते याचा देखील नागरिकांना विसर पडू लागलाय.शहरातील जगदंबा भाजी मंडईत एकदा मुख्याधिकारी यांनी सपत्नीक भाजी घ्यायला जाऊन पहावं म्हणजे त्यांना कळेल,ही मंडई आहे की उकिरडा आहे ते!(विशेषतः पाऊस पडल्यानंतर आवर्जून जावे)
गेल्या काही वर्षांमध्ये तर पालिकेच्या राजकारणात असा ट्रेंड निर्माण झालाय की,निवडून येण्यापुरते गट आणि परस्पर विरोध ! पण एकदा निवडून आले की सगळ्यांची मिलीभगत…मिल बांटके खावो ! त्यामुळं तर शहराची वासलात लागणं सुरू आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी गेल्या काही वर्षांत राज्य व केंद्र सरकारच्या ” स्वच्छ शहर,सुंदर शहर ” या स्पर्धेत भाग घेऊन करमाळा पालिकेने मिळवलेल्या पुरस्कारांचा गवगवा देखील त्या-त्या वेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.निर्लज्जपणाचा कहर तरी किती असावा ? असो…
पण आजमितीला करमाळा शहराची सर्वार्थाने झालेल्या दयनीय अवस्थेस प्रामुख्याने पालिका प्रशासन व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची कर्तव्यशून्यता,बेपर्वाई याच बाबी कारणीभूत आहेत.कारण लोकनियुक्त प्रतिनिधी हे अस्थायी असतात आणि प्रशासन हे स्थायी असते आणि अंमलबजावणी,कारवाई करण्याचं,सेवा देण्याचं कर्तव्य हे प्रशासनयंत्रणा म्हणजेच नोकरशाहीचं असतं.पण आपल्या देशात लोकशाहीच्या नावाखाली खऱ्या अर्थाने नोकरशाहीच मुजोर झालीय…त्याला करमाळा पालिका अपवाद कशी असणार ? त्यामुळं आज करमाळा शहराला प्राप्त झालेल्या बकालपणाला फक्त नी फक्त पालिकेचे निष्क्रिय,भ्रष्ट प्रशासनच जबाबदार आहे हे निश्चित !
विवेक शं. येवले
दि.०१/०७/२०२४