‘या’ योजनेअंतर्गत उपचारांवर खर्च होणाऱ्या पैश्यांची होणार बचत
मुंबई ,विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण
महाराष्ट्र शासनाची प्रमुख आरोग्य विमा योजना असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्याच्या सर्व सरकारी रुग्णालयात नागरिकांना प्रत्येक आजारावर मोफत उपचार दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेच्या कवरेजची सीमा 2 लाखांवरून वाढून 5 लाख करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ पूर्वी फक्त अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड धारकांना, अन्नपूर्णा रेशनकार्ड धारकांना आणि केशरी रेशनकार्ड धारकांना मिळत होता. मात्र गेल्या वर्षी जूनमध्येच महाराष्ट्र सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवल्याने राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की , महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत . महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दरवर्षी जवळपास 2.55 कोटी नागरिक मोफत उपचार घेतात.
यामध्ये रुग्णाला सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या 2418 संस्था , प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय आणि कर्करोग रुग्णालय येथे मोफत उपचार मिळणार आहे.