दुःखाचा डोंगर कोसळलेल्या छायाताईला मिळाली कर्मयोगीची प्रेमरूपी छाया..
वडिलांचे छत्र हरविलेल्या आतिक्षाच्या लग्नाला १० हजार रुपये व साडीचोळी देऊन सहकार्य ..
चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया या उपक्रमा अंतर्गत कर्मयोगी फाऊंडेशन सतरावी लग्न कार्यासाठी मदत घेऊन वडिलांचे छत्र हरवलेल्या मांडवा मारवाडी ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील कु. आतिक्षा गणेश चांदेकर ताईच्या घरी जाऊन पोहोचले.
२००० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी माहेरची आईवडिलांची छाया सोडून लग्न होऊन सासरच्या छायेत मांडवा मारवाडी येथे छायाताई गणेशराव यांच्या जीवनसाथी बनून आल्या.*
सासरची परिस्थिती अत्यंत दयनीय कुळामतीच्या घरात गणेशराव यांच्यासोबत शेतमजूरीचे काम करत हातावर आणून पानावर खात आपला संसाराचा गाळा कष्टमय आनंदात ओढत होत्या. आता संसार बहरू लागला होता. वेलीला पान फुटावी तशी या संसारात आतिश व आतिक्षा ही दोन मुलं जन्माला आली.
गणेशराव यांनी सुद्धा आपली मुलं चांगली शिकावी हा उद्देश घेऊन शेतमजुरीचे काम सोडून गुमगाव परिसरातील कंपनीत कामाला जाणे सुरू केले, परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. २०१५ मध्ये कामाला जात असताना त्यांच्या दोन चाकी गाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी गाडीने उडविले व क्षणात होत्याचे नोव्हतें झाले.
त्यांचा सवंगडी जागेवरच मरण पावला तर गणेशराव यांची मेडिकल मध्ये नेतांनाच रस्त्यांतच प्रणज्योत मावळली.*
छाया ताईच्या जीवनात वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांच्यावर पडलेला हा दुःखाचा डोंगर होता. आतिक्षा तर त्यावेळी फक्त अकरा वर्षाची होती. मामाने छायाताईचे दुःख कमी करण्यासाठी स्वतः पुढाकार घेत कुळामतीचे घर विटामातीत बांधून दिले. परंतू याच काळात छायाताईला किडनीच्या आजाराने ग्रासले, त्यामुळे त्यांचे कामाला जाणे कमी झाले. ही परिस्थितीपाहून मुलगा आतिश याने सुद्धा आपले शिक्षण सोडून कंपनीत जाणे सुरू केले तर आतिक्षाने बारावी नंतर फाँशन डिझाइनचा कोर्स करून आईला हातभार लावू लागली..
दुःखाचे व संघर्षाचे दिवस जीवनातून जात असतानाच आतिक्षा२२ वर्षाची झाली. ताईला आतिक्षाच्या लग्नाची चिंता आता जाणवू लागली, त्यातच किडनीचा आजार शरीराला कमजोर करत चलला आहे. त्यामुळे शरीर अधीकच कमजोर होण्याआधी छायाताईने स्वतःच पुढाकार घेत यावर्षी आतिक्षाचे लग्न जुळून आणले.
मुलाने सुद्धा परिस्थिती जाणून एकही पैसा न घेता लग्न करण्यास पुढाकार घेतला.
आपल्या एकुलत्या एका बहिणीचे लग्न होण्यासाठी भाऊ आतिश सुद्धा आपल्या लहान वयात मोठ्या प्रमाणात कष्ट घेत आहे.
छायाताई सुद्धा लग्न आनंदात पार पडावे यासाठी आजाराने ग्रस्त असताना नातेवाईकांची मदत मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे.
या सर्व गोष्टींची जाणीव ठेवत कर्मयोगीने छायाताई यांच्या वेदना कमी करण्यासाठी, येत्या ३० मे २०२४ ला आतिक्षा ताईचे लग्न होत आहे. तीने सुखी संसाराच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला सुरवात करावा यासाठी, तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी, १० हजार रुपयांची आर्थिक मदत करत तिला साडीचोळी देऊन कर्मयोगी गाडगेबाबा यांचे विचार कृतीतून जपले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आतिक्षा म्हणाली की बाबा गेल्यावर आम्हाला कधीकधी उपाशी राहण्याची वेळ सुद्धा आली, घर असे होते की त्यात नेहमी विंचू साप निघत होते, थोडं पाणी आलं तरी दुसऱ्यांच्या घरी राहायला जावं लागे, त्यातही आईला किडनीचा आजार झाला, माझ्या भावावर आता सर्व जबाबदारी आली आहे. आमच्या आनंदात भर घालण्यासाठी कर्मयोगी ही पहिली संस्था सरळ माझ्या घरापर्यंत आली ते पाहून मला इतका आनंद झाला की मी ते शब्दात मांडू शकत नाही.
यावेळी गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवारातील सदस्य उपस्थित होते.