June 28, 2025 5:38 pm

मोदी व शाह यांना खरी शिवसेना कोणाची हे चार जूनला दिसेल !

अपनी भाषा में पढ़े! Translate

मोदी व शाह यांना खरी शिवसेना कोणाची हे चार जूनला दिसेल !

गद्दार हो ! गाशा गुंडाळून ठेवा
तुमच्या पापांचा घडा भरला आहे !

गद्दारनाथाने, शिवसेना फोडली,चिन्ह व नाव शासकिय यंत्रणांकडून गैरमार्गाने मिळवले.तो बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतात, आमचीच खरी शिवसेना,आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार ! आम्हीच धर्मवीरांचे पट्टशिष्य !
अरे शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार ! (मालवणी म्हण ) बाप हा बाप असतो, त्याची चप्पल पायात बसली, सदरा अंगात बसला की तो बापाची जागा घेऊ शकत नाही. ज्या घराने तुला आसरा दिला, तुझे संगोपन केले, तुझ्या सर्व इच्छा आकांशा फलद्रूप केल्या त्या घरावर तू मालकी हक्क सांगतोस ? बापालाच घरातून हाकलतोस ? बाप म्हणजे सात × बारा समजलास का ? की कधीही फेरफार करावा ? बाप हा बाप असतो, त्याचा शाप, तळतळाट आणि अश्रूंची किंमत मोजावीच लागते, हा जगाचा नियम आहे ! गद्दारनाथ हो ! हा निसर्गदत्त नियम बदलण्याची कुवत तुमच्यात नाही ! कारण परमेश्वराची लाठी जेंव्हा चालते, तेव्हा आवाज येत नाही परंतू फटका हा जीवघेणा असतो.

गद्दारनाथ हो ! आत्ता तुमच्या पापाचा घडा काठोकाठ भरलेला आहे ! *तुमचा दिल्लीतला उधार उसनवार घेतलेला बापही तुम्हाला वाचवू शकणार नाही. मुलं दत्तक घेतलेले ऐकले होते परंतू तुम्ही तर दिल्लीचे दोन बाप दत्तक घेतले. एक जुमलेबाज तर दुसरा माजी तडिपार गुंड ! शाहा बोलला- उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे ! आणि या भगोड्या रणछोडदासांची शिवसेना असली आहे !
तुला कोणी न्यायाधिश नेमले ? असे माजी तडिपार गुंड न्यायनिवाडा करायला लागले तर लोकशाहीचा मुर्दा व संविधानाचा खुर्दाच पडेल.*

जुमलेबाज मोदी शाह यांनी बाळासाहेबांची व महाराष्ट्राची अस्मिता असलेली शिवसेना फोडण्याचे महापातक केले आहे, त्याची किंमत ४ जूनला तुम्हाला सत्ताभ्रष्ट व पदमुक्त होऊन मोजावीच लागणार आहे. महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे, आई तुळजा भवानी व छत्रपती शिवाजी महाराज ही आमची जागृत दैवतं आहेत. आमची मनं सह्याद्रीसारखी कणखर आहेत. गद्दारांचा कडेलोट टकमक टोकावरून कसा करायचा व त्यांना हत्तीच्या पायदळी कसे तुडवायचे ? याचे बाळकडू आम्हाला शिवरायांनी पाजले आहे.

एकनाथ मिंधे, तुम्ही आत्ता औट घटकेचे मुख्यमंत्री राहिला आहात. लोकसभा निवडणूकीचा निकाल लागेल त्यात तुमचा निक्काल लागणारच आहे. त्यानंतर हे भाजपवाले तुम्हाला यूज एण्ड थ्रो प्रमाणे डस्टबीनमधे टाकून देतील. खरी शिवसेना कोणाची हे मोदी शाहा ही जोडी ठरवणार नाही तर मतदार राजा याचा न्याय निवाडा करणारच आहे. मोदी सरकार हद्दपार झाल्यावर तुमची काय अवस्था होईल. दुस-याच दिवशी तुमची गच्छंती होऊन ७० हजार कोटीचा सिंचन घोटाळाफेम अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल. ज्या अजित पवारांच्या निधी वाटपाच्या पक्षपातीपणामुळे तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही ! असे बोलला होतात त्याच पवारचे अंकित राहून तुम्हाला मान खाली घालून मिंधेपणाने वावरावे लागेल. ही माझी भविष्यवाणी वा भाकित समजू नका ! मी कोणी कुडबुड्या जोतिषी नाही तर ४४ वर्षे तावून सुलाखून निघालेला परिपक्व व प्राईज टॅग न लागलेला पत्रकार आहे, हे विसरू नका ! तुमचा एक वर्षाच्याभाडे करारावर घेतलेला निर्लज्ज बनो, प्रवक्ता म्हणतो- ४५ पार होणार ! त्याला दोन पाच हजाराचा भत्ता वाढवा तो ४८ पार करीत सुटेल.

एकनाथराव (?) तुम्ही खरोखर एकटेच राहणार आहात. दिल्लीतले बाप तुमची सावलीही टाळतील. चारित्र्यहिन स्त्री व कर्तृत्वहिन पुरूष हे दोघेही त्याज्य असतात. महाराष्ट्रात तुम्ही अट्टाहास करून १५ जागा पदरात पाडून घेतल्या याचा आनंद क्षणभंगूर ठरणार आहे. आपण तीन विद्यमान खासदारांचा स्वत:च्या राजकिय लाभासाठी बळी घेतला आहे. ४० आमदारांना टकमक टोकावर आणून सोडले आहे. तुम्ही तुमची विश्वासार्हता ( गद्दाराकडून तशी अपेक्षा करणेच मुर्खपणा असतो ) गमावली आहे.
जो ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ज्याला तुम्ही स्वत:चे होम पिच समजता, तिथेच तुमचे पानिपत होणार आहे. ठाण्यातून राजन विचारे व कल्याणमधुन तुमच्या लाडक्या श्रीकांतचा दारूण पराभव करून वैशाली दरेकर या विजयी होणार आहेत. भिवंडीतूनही बाळ्यामामा तुतारी वाजवत विजयी होणार आहे. जो आपला तथाकथित बालेकिल्ला (?) राखू शकत नाही, जो आपल्या मुलाचा पराभव रोखू शकत नाही, त्याला कोण जवळ करेल. तुम्ही जी गद्दारी केली आहे तिचे पापक्षालन तुमच्या पराभवानेही होणार नाही.

आपला संजय शिरसाट अजूनही गोहाटीचा नशेतून बाहेर पडलेला दिसत नाही. आपणही त्याच नशेत वावरत आहात. शिरसाट म्हणतात- ४५ पार करणार ? तो दीडफुट्या म्हस्के तर स्वत:ला हत्ती समजायला लागला आहे ! ४ जूनला निकाल लागल्यावर यांचे तोंड लपवायला पुन्हा सूरत गोहाटी किंवा गोव्याला एखादे रिसॉर्ट बुक करून ठेवा !

आमचीच शिवसेना खरी आहे. ती किमान १८ जागांवर विजयी होणार तर तुमची एखाद दुस-या जागेवर बोळवण होईल,हे विधी लिखीत आहे. विधाता ते माझ्या हातून लिहून घेत आहे, इतकेच ! महाविकास आघाडी किमान ३० जागी विजयी होत आहे. देशाचा विचार केला तर मोदी आघाडी २५० पार करू शकणार नाही.

गेले काही दिवस तुमचेच लोक तुमची कान उघडणी करीत आहेत.

तुम्ही पळवून नेलेले ( Kidnap केलेले ) रविंद्र वायकर यांनी स्पष्टपणे तुमच्या बळजबरीमुळे नाईलाजाने पक्षप्रवेश करावा लागल्याचे जाहिर केले. बळजबरीने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले व त्यांची राजकिय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

तुमच्याच सरकार मधील सहकारी आमदार बच्चु कडू म्हणतात – महायुतीला अपेक्षित असलेले बहुमत मिळणार नाही.त्यांच्या विरोधात जनमत आहे.

राज ठाकरे यांचा तर तुम्ही फियास्को करून टाकला आहे. मतदाना नंतर त्यांची बोलती बंद झाली आहे. त्यांनी एकही जागा का लढवली नाही ? याचे उत्तर त्यांना आधीच कळलेअसावे.

तुम्ही पळवून नेलेल्या ८२ वयाच्या गजानन किर्तिकरांनी तर तुमचे वस्त्रहरणच केले. अमोल निष्ठावंत आहे, प्रामाणिक आहे.त्याला तुम्ही एमएलसीचे आमिष दाखवूनही त्याने बापाप्रमाणे गद्दारी केली नाही, आत्ता तो थेट खासदार होईल, तो मातोश्रीशी एकनिष्ठ आहे. मी माझ्या निर्णामुळे कुटुंबात एकटा पडलो !

अजून किती पुरावे हवेत तुमच्या दिल्लीतील शहेनशाहाला ? खरी शिवसेना कोणाची हे त्या माजी तडिपारला दाखवा ! नाही तर निकाल लागतील ते डोळे फाडून बघायला सांगा ! आणि तुम्ही त्या दिवशी निकाल ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल, त्यामुळे आधीच मानसोपचार तज्ज्ञाचा इलाज करून घ्या ! कारण तुम्ही पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेले पाहण्यास महाराष्ट्रासह आनंद आश्रम व टेंभी नाका आसुसलेला आहे.

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०

२२ मे २०२४

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!