चिन्मय मांडलेकर शिवरायांना का बदनाम करता ?
दत्तकुमार खंडागळे
प्रसिध्द अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचे नाव ‘जहांगिर’ ठेवल्याने त्यांच्या पत्नीस ट्रोल केले गेले. त्यानंतर नेहा मांडलेकर यांनी या विषयावर बोलताना आपण देशस्थ ब्राम्हण आहोत व नवरा द्वेष्टा कासार जातीचा असल्याचे सांगितले. तसेच मुलाचं नाव ‘जहांगिर’ असूनही माझ्या पतीने शिवरायांची भूमिका केली त्याबद्दल आम्हाला माफ करा. असे सांगत टाटांचेही नाव जहांगिर असल्याचा दाखला दिला. तसेच ‘जहांगिर’ हे नाव ‘मुस्लिम’ नसून ‘पर्शियन’ आहे, तसेच त्याचा अर्थ ‘जगजेत्ता’ असा होत असल्याचे सांगितले.
यावर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ट्रोल झाल्याबद्दल खेद व्यक्त करत, “मी परत शिवाजी महाराजा़ची भूमिका करणार नाही !” असे म्हटले आहे. खरेतर चिन्मय मांडलेकर यांची ही भूमिका शिवरायांचा अवमान करणारी व शिवाजी राजांना मुस्लिम द्वेष्टा ठरवणारी आहे. त्यांनी शिवाजी राजांची भूमिका करण्याचा किंवा न करण्याचा काय संबंध ? त्यांनी ट्रोलर्सबाबत किंवा देशभरात जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि ज्यांनी ते निर्माण केले आहे त्यावर भाष्य केले नाही. गेल्या दहा वर्षात भाजपाच्या बुडाखाली द्वेषाची जी बचबच निर्माण झाली आहे त्यावरही त्यांनी भाष्य केले नाही. चिन्मय मांडलेकरांची ही भूमिका चलाखीत बसणारी आहे. त्यांना जर या ट्रोलर्सबद्दल चिड असती तर त्यांनी थेट मुळावर घाव घातला असता. पण ते तसे बोलले नाहीत. ते मुळावर घाव घालत नाहीत. त्यांची भूमिका शिवरायांना बदनाम करणारी आहे. सध्या देशभरात ट्रोलर्सची विकृत भुतं बळावली आहेत ती धर्मांध प्रचार-प्रसारातून प्रसवली आहेत. हा जाती-धर्माधिष्टीत माज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुजबुज यंत्रणेने पेरला आहे. चिन्मय मांडलेकर यांनी ज्या चित्रपटात शिवरायांची भूमिका केली आहे त्यातूनही चुकीचा इतिहास, द्वेषाची बिज पेरली आहेत. ‘कश्मिर फाईल्स’ सारखे फालतू चित्रपट याच पोतडीतले. पण मांडलेकरांनी त्याच्याविरूध्द तोंड उचकटलेले नाही. त्याचा त्यांनी फायदा उपटला आहे. तुम्ही जे पेराल ते उगवणारच. त्यासाठी तुम्ही काय पेरता ? याला महत्व आहे. ‘बाभळीचे’ बी पेरायचे आणि ‘आंब्याची’ अपेक्षा करायची असं कसं होईल ? तुम्ही जे विष पेरताय ते अंगाशी येणारच. मांडलेकर गुण्या-गोविंदाने राहणा-या या देशात विषाची पेरणी आणि फवारणी कोणी केली ? मांडलेकरानी “शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही !” असे भंपक बोलण्यापेक्षा या जातीयवादी विखारी प्रवृत्तीवरूध्द शिवरायांची तलवार उपसावी. दम असेल तर त्यांनी या प्रवृत्तीविरूध्द ताकदीने लढावे. मांडलेकर तुमची बायको देशस्थ ब्राम्हण असल्याने आणि तुम्हीसुध्दा या विषारी गोतावळ्यातलेच असल्याने तुम्हाला इतका त्रास नाही. पण देशात या प्रवृत्ती इतक्या माजल्या आहेत की ते कुणाच्याही जीवावर उठू लागलेत. कुणी कशाचा स्टेटस ठेवला ? यावरून लोकांचे जीव घेवू लागलेत, गावा-गावात दंगली घडवू लागले आहेत. चिन्मय मांडलेकर तळागाळातले असते, सामन्य असते तर त्यांना व त्यांच्या बायकोला मारहाण सहन करावी लागली असती. कदाचित जीवही गमवावा लागला असता. सामान्य माणूस आज या धर्मांध अजगरांच्या विळख्यात सापडला आहे. तो सुरक्षित नाही. त्याने या झुंडी विरूध्द भूमिका घेतली किंवा एखाद्या मुस्लिम शासकाचे नाव जरी घेतले तर त्याच्यावर या विकृती तुटून पडतात. अतिशय गंभीर स्थितीतून आज देश जातो आहे. भारताच्या पोटात संघोट्यानी तालिबान पेरला आहे. हा तालिबान एक ना एक दिवस मांडलेकर वगैरे पिलावळींच्याही जीवावर उठणार आहे. मग तुमची बायको देशस्थ ब्राम्हण असो किंवा आणखी कोणी. ही विषवल्ली एक ना एक दिवस सर्वांच्यांच अंगाशी येेणार हे नक्की. धर्माच्या नावे निर्माण झालेल्या पाकीस्तानात, तालिबानात स्वधर्मीयांचाही बळी घेतला जातोय. हिंदूत्वाच्या नावाने भारतात माजलेले हे धर्माध देशी तालिबानी लोक भविष्यात हिंदूच्याच जीवावर उलटणार आहेत. जे पाकिस्तानात, अफगाणीस्तानात घडतय तेच भारतात घडणार. कारण द्वेषाच्या पोटी जन्माला आलेले विधायक किंवा सृजनशील घडवत नाहीत.
या देशाचा प्रधानमंत्री प्रचारसभेत बोलताना धर्मांध व विखारी भाषा बोलतो. त्यांचे बोलणे चौकातल्या कुचाळ कट्ट्यवर बोलणा-या कुचाळखोर किंवा टूकार माणसासारखे होते. आजपर्यंत या देशाचा एकही प्रधानमंत्री इतक्या खालच्या पातळीवर गेलेला नाही. अटलजी भाजपाचेच होते पण त्यांनी नेहमी प्रधानमंत्रीपदाचा गरिमा राखला. त्यांनी कधीच असला हलकटपणा केलेला नाही. सध्याच्या प्रधानमंत्र्यानी या पदाची लायकी काढली आहे. कॉग्रेस जास्त मुलं जन्माला घालणा-यांना देशाची संपत्ती वाटणार असल्याचे म्हटले आहे. हे बोलताना त्यांना हिंदू-मुस्लिम कार्ड खेळायचे आहे. प्रधानमंत्र्यांचे हे वक्तव्य मांडलेकरांना ट्रोल करणारांच्या ट्रोलर्सच्या लायकीचेच आहे. त्यांच्यात आणि मांडलेकरांना ट्रोल करणारांच्यात गुणात्मक काहीच फरक नाही. असा माणूस जर देशाच्या सर्वोच्च पदावर असेल तर भारताचा भविष्यकाळ काय आणि कसा असेल ? मांडलेकरांना ट्रोल करणा-या प्रवृत्तीची चिड असेल तर त्यांनी मोदींचा निषेध करायची हिम्मत दाखवावी. मांडलेकरांच्या बुडात दम असेल तर त्यांनी मोदींच्या या टूकारपणावर बोलावे. त्याचा जाहिर निषेध करावा. कारण देशभर माजलेली ट्रोलर्सची विखारी भुतं याच मोदी, शहा व संघ परिवाराने पोसली आहेत. मांडलेकरांना खरच या विकृतांची चिड असेल तर त्यांनी यांच्यावर बोलावे. शिवरायांना बदनाम करू नये. शिवरायांची भूमिका करणार नाही असे सांगत विषपेरणी करू नये.
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, 9561551006