करमाळा प्रतिनिधी :- उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्याने करमाळा शहरास तीन ते चार दिवसानंतर पाणी पुरवठा होत असून त्यामध्येही कमी दाबने पाणी पुरवठा होत असल्याने आज करमाळयातील नागरिकांनी नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत तीव्र भाषेत संताप व्यक्त केला. यावेळी मुख्याधिकारी तपसे यांनी संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांना पाणी पुरवठा सुरळीत सुरळीत न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांना ज्या भागात कमी दाबने पाणी पुरवठा झालेला आहे त्यांना पुन्हा आज दि. 26/04/2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. परंतु जेऊर रोड वरील झरे फाटयाजवळ रायझिंग मेन वरील मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा करण्यास अधिकारी यांना पुन्हा अडचण आल्याने मुख्याधिकारी तपसे यांनी नागरिकांचे पाण्याविना हाल होवू नयेत म्हणून उदया दि.27/04/2024 (करमाळा शहरातील खडकपूरा, भिमनगर, किल्ला विभाग, किल्ला वेस, सिध्दार्थ नगर) रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार असल्याचे जाहीर केलेले आहे.
तसेच यावेळी तपसे यांनी सांगितले की, झरे फाटयाजवळ पाईप लाईन फुटली असल्याने दुरूस्तीचे काम नगरपरिषदेने युध्दपातळीवर हाती घेतले असून नागरिकांची पाणी ही मुलभूत गरज असल्याने नगरपरिषद जनसेवा हिच ईश सेवा हे ब्रीद वाक्य घेवून सक्षम व प्रभावीपणे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच गायकवाड चौक ते सिध्दार्थ नगर येथील वॉल दुरूस्तीचे काम ही हाती घेवून नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केलेले असल्याने नागरिकांनी संयम बाळगावा अशी विनंतीही यावेळी मुख्याधिकारी तपसे यांनी नागरिकांना केलेली आहे.