करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – सोलापूर जिल्हयासह करमाळा तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. तसेच उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्याने करमाळा नगरपालिका प्रशासन दुबार पंपींग करून नागरिकांना पाणी पुरवठा करून देण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु वारंवार दहिगांव येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याने तसेच पंपींग मशिनरी नादुरूस्त होत असल्याने सातत्याने करमाळा शहरास होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे शहरास पाणी पुरवठा हा तीन ते चार दिवसानंतर केला जात असल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना पहायला मिळत आहे.
परंतु जामखेड रोड येथील सुखशांती नगर येथे मात्र नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे मागील 15 दिवसांपासून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला पहायला मिळत आहे. याबाबत सुखशांती नगर येथील रहिवासी हनुमंत भांडवलकर यांनी सांगितले की, आमच्या येथे नगरपरिषदेची पिण्याच्या पाण्याची ऊंच टाकी असून मागील 15 दिवसांपासून टाकीतून पाणी ओव्हरफ्लो होत आहे. याबाबत नगरपरिषदेस संपर्क साधून कर्मचारी चालढकल करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी अक्षरश: रस्त्यावर वाहून जात आहे. सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना अशा पध्दतीने पाणी वाया जात असल्याने आगामी काळात तीव्र पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने दोन दिवसांत ओव्हरफ्लो होणारे पाणी बंद केले नाही तर आम्ही नगरपरिषदेच्या कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असून याकरिता आम्हाला सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांचा पाठींबा मिळत आहे.
कमलाकर भोज, कर्मचारी पाणी पुरवठा विभाग करमाळा नगरपरिषद – सदरच्या ऊंच पाणी टाकीचा वॉल्व खराब झालेला आहे त्यामुळे टाकीतून पाणी ओव्हरफ्लो होत आहे तात्काळ सदरची दुरूस्ती करून घेत आहोत. त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा अवलंबू नये.