करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा तालुक्याचे राजकारणात आजपर्यंत गटा तटा भोवती फिरत आले आहे. तालुक्याला सहसा राजकीय पक्षाचा आधार आतापर्यंत घ्यावा लागला नव्हता. परंतु मागील विधानसभेपासून करमाळा तालुक्यात विविध राजकीय पक्ष आपली बाजू भक्कम करताना दिसत आहेत. त्यातच मागील विधानसभेला शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचे तिकीट कापत रश्मी बागल कोलते यांना शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी दिली. रश्मी बागल कोलते यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात नामदार तानाजी सावंत यांचा मोठा सहभाग असल्याच्या चर्चा त्यावेळी कट्टयाकट्यावर रंगल्या होत्या. परंतु बागल यांना उमेदवारी देवूनही शिवसेना पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तर अपक्ष नारायण पाटील हे अवघ्या चार ते साडे चार हजार मतांनी पराभूत होत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांनंतर सावंत व पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (उबाठा पक्षातून) बाहेर पडल्यानंतर पाटील यांनी शिंदे यांची भेट घेत आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावेळी तशा आशयाचे वृत्तही प्रसिध्द झाले होते. त्यामुळे पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करणार असल्याचे सिध्द झाले होते. त्यानंतर मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सावंत व पाटील यांची कटुता थोडयाप्रमाणात कमी झालेली पहायला मिळाली. आदिनाथ कारखाना नारायण पाटील चालवणार असल्याच्या चर्चा रंगतानाच कारखान्यावर प्रशासकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली व त्यामध्ये नामदार सावंत यांचाच मोठा सहभाग असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आदिनाथ कारखान्यावर प्रशासकीय संचालकांची वर्णी लागल्याने पुन्हा पाटील व सावंत यांच्यातील दुरावा वाढला. सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा अडचणीत येवून बंद पडलेला आहे.
मागील आठवडयात शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी करमाळा येथे आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियानाकडे पाटील यांनी पाठ फिरवली असल्याचे अनेक वृत्तपत्रामधून वृत्त प्रसिध्द झाले. याबाबत स्वत: शिवाजी सावंत यांनी पाटील यांना दहा वेळा फोन करूनही ते आले नाहीत अशी खंत अभियानामध्ये बोलून दाखविली. करमाळा तालुक्यात शिवसेना पक्षासाठी मोठया नेत्याची आवश्यकता असून मागील विधानसभेत क्रमांक दोनवर राहिलेले पाटील हे पक्षासाठी महत्वाचे नेते असल्याने शिवसेना पक्ष पाटील यांना डावलणार नाही. त्यामुळे पाटील यांची नाराजी कमी व्हावी म्हणून आज प्रत्यक्ष आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जेऊर येथील पाटील यांच्या कार्यालयात जावून त्यांची भेट घेतली आहे. यावेळी नामदार सावंत व पाटील यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु यावरून एक सिध्द होते ते म्हणजे शिवसेनेला नारायण पाटील यांच्यासारखा जनमाणसातील नेता गमावणे धोक्याचे आहे. या भेटीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नामदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली बेरेजेचे राजकारण करताना दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा यामध्ये काय घडामोडी घडणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.