निकृष्ट कामामुळे डांबरीकरणाचा उडतोय धुराळा

बहाळ ते जुवार्डी दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून जवळपास सव्वा किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरनाचे काम मागील काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी 28 ते 30 लाखांचा निधी मंजूर होऊन त्यावर खर्च करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात खडीकरण त्यानंतर दोन टप्प्यात डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. परंतु सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून टाकलेला डांबरावर अक्षरशः धुराळा उडतांना दिसत आहे. यासंदर्भात गावातील काही सुज्ञ नागरिकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक गाव व खेड्यांना जोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून रस्त्यांच्या विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी वितरित करण्यात येतो.परंतु काही ठेकेदारांची मनमानी व नियंत्रित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे कामांची वेळेवर तपासणी होत नाही त्यामुळेच निकृष्ट दर्जाची काम करून डांबरीकरण अथवा खडीकरण केले जाते.ही कीड निवळ एकाच भागापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची अशाच प्रकारे वाताहत दिसून येते.ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कधीतरी भाग्य उजळते अशातच निकृष्ट व बोगस कामांमुळे शासनाकडून मिळालेल्या नीधीचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे कमी कालावधीतच रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले दिसतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी ठेकेदारांकडून उच्च दर्जाची कामे करून घेणे गरजेचे आहे. मात्र हे काम त्या गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या मदतीने सध्यातरी होतांना दिसत आहेत. मात्र अशा प्रकारे आवाज उठवणाऱ्या विरुद्ध पुन्हा गावात विरोधाभास निर्माण केला जातो. विकास कामे झालीच पाहिजे परंतु ती होताना तिचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही सुज्ञ मंडळी पुढाकार घेऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न करतात मात्र काही मंडळी याचा विपर्यास करून त्या तक्रारदारांना बदनाम करण्याचे काम करताना दिसतात.