पुणे शहरात ‘आयसीयूचा’ बेड शिल्लक नाही, पालकमंत्री अजित पवार भानावर या – उमेश चव्हाण
प्रतिनिधी – कैलास कांबळे
दि. 8/10/2023
पुणे 08 ऑक्टो.- संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या पाच दिवसात हजारो अत्यवस्थ रुग्ण निर्माण झालेले आहेत. पुणे शहरातील कुठल्याच हॉस्पिटलमध्ये सध्या ‘आयसीयू’चा बेड शिल्लक नाही, अशा पद्धतीची भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना पालकमंत्री अजित पवार देवदर्शनामध्ये आणि जेसीबीतून होणारी फुलांची उधळण अंगावर घेण्यात, स्वागत सत्कार आणि हार-तुरे स्वीकारण्यामध्ये गुंतलेले दिसतात. राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही जायला तयार नाही. पुणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ‘आयसीयू’ची व्यवस्था नाही. अशावेळी खाजगी हॉस्पिटल मधले आयसीयू विभागातील बेड शिल्लक राहिलेले नसताना अजित पवार यांचे ‘रोगराई’ पसरलेल्या पुण्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते, त्यामुळे ‘पालकमंत्री अजित पवार तुम्ही भानावर या!’ अशी टीका रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मुळात आरोग्य क्षेत्रातले काही कळते का? त्या दोघांकडे ही खाती कशासाठी दिलेले असावीत? असे कोडे देखील महाराष्ट्रातील नागरिकांना पडले आहे. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात 50 हून अधिक बालके दगावली. ससून रुग्णालय तर भ्रष्टाचाराचे माहेरघर झालेले आहे. धोकादायक आरोपी आणि मस्तवाल कैद्यांना पोसणारे ससून रुग्णालयासह राज्य सरकारचे कुठल्याही सरकारी रुग्णालयांमध्ये आता सर्वसामान्य माणूस जायला प्रचंड घाबरत आहे. अशावेळी खाजगी हॉस्पिटल कडे धाव घेतली जाते मात्र त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेचे, अतिदक्षता विभागाचे म्हणजेच आयसीयू चे बेडच शिल्लक नाहीत. पण नाजूक – गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा आरोग्य विभागाने अजून पर्यंत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? रुग्णालय शोधताना कोणत्या पद्धतीचे मार्गदर्शन घ्यावे? धर्मदाय हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयांचे डिपॉझिट मागितले जात असताना त्यावर कोणते निर्बंध घालावेत? आजारपणाच्या अत्यंत भयंकर बिकट परिस्थितीच्या काळातील लोकांवर येणारे आर्थिक संकट ओळखून त्यांना कशी मदत करावी? लोकांना काही दिलासा देता येईल का? या संदर्भात पालकमंत्री झालेल्या अजित पवारांनी प्रयत्न करायचे सोडून दिलेले दिसते. पालकमंत्री अजित पवार सध्या हार तुरे स्वीकारण्यात आणि देवदर्शनामध्ये इतके गुंतले आहेत कि पुणे जिल्ह्यातील नागरिकच आता ‘देवा घरी’ चाललेत तरी अजित पवारांना येथील वर्तमान परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही, हे महाराष्ट्राचे आणि पुणेकरांचे फार मोठे दुर्दैव आहे, असेही परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तात्काळ महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आय सी यु चे विभाग सुरू करावेत आणि रुग्णांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर समस्त आजारी नागरिक -रुग्णांना घेऊन महानगरपालिकांवरती मोर्चे काढू असा संतप्त इशारा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला.