शिरूड येथे डॉक्टर अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन..
तालुक्यातील शिरूड येथे फार्मर कप स्पर्धेतील सहभागी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ यांनी भेट दिली.
अमळनेर : विक्की उत्तम जाधव..
शिरूड येथे 40 महिलांनी स्वतंत्र तीन गट स्थापन करून पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. फार्मर कप हा कमीत कमी खर्चात रासायनिक खते न वापरता, पारंपरिक पद्धतीने शेती करून, जैविक खते वापरून जास्तीत जास्त उत्पन्न देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत राज्य आणि तालुकास्तरावर व्यवस्थित नियोजन करणाऱ्या महिलांच्या गटाला बक्षीस दिले जाते.
या स्पर्धेत महिला सुरुवातीला उगवण क्षमता वाढविण्यासाठी बीज प्रक्रिया करतात. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून बियाण्याचे संरक्षण होते. तसेच शेतात कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळे कामगंध सापळे व पक्षीथांबे लावले जातात, जेणेकरून रासायनिक फवारणीचा वापर कमीत कमी केला जातो. यामुळे जमिनीचे प्रदूषण थांबून पोत सुधारतो व आपल्याला रसायन विरहित उत्पादन घेता येते. या प्रक्रियेत रासायनिक फवारणी ऐवजी दशपर्णी अर्क व निम अर्क घरच्या घरी कमीत कमी खर्चात तयार करून फवारला जातो. यातून हवेचे प्रदूषण देखील कमी होते. मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी महिला आडजी- पडजीने एकमेकांच्या शेतात जाऊन निंदणी व इतर शेतीची कामे करतात. एकूणच या स्पर्धेतून उत्पादनाचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.गावातील उपसरपंच सौ. कल्याणी पाटील यांनी सर्व स्त्रियांना एकत्र करून वरील प्रमाणे गट स्थापन केले.
या स्त्रियांच्या कामाची दखल घेऊन पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ हे शिरूड गावात त्यांना मार्गदर्शनासाठी आले डॉक्टर पोळ हे सात देशांचे पाणी व्यवस्थापन या विषयावरचे सल्लागार आहेत. पाण्याचा डॉक्टर म्हणून त्यांची जनसामान्यात ओळख आहे. सुमारे वीस वर्षापासून त्यांनी ग्राम स्वच्छता व जलसंधारण कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे ते विश्वस्त आहेत त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांना शेतीतले बारकावे समजावून सांगितले. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. मी हे काम करताना मला आनंद मिळतो आणि त्या आनंदातून समाजाचा विकास होतो याचा मला मनस्वी आनंद आहे असे ते म्हटले. बीज लावताना त्याला बेसल डोस द्यावा तो आईच्या दुधाइतका पिकांसाठी महत्त्वाचा असतो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष पाटील होते त्यांनीही प्रथमच इतक्या संख्येने महिला हजर राहून महिलांनीच हा कार्यक्रम घडवून आणला त्याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका पाटील यांनी केले. अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त दोन महिलांपैकी सुमनताई यांनी मनोगत व्यक्त केले तर मंगलताई काळू पाटील यांनी आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुनील पाटील व तुषार पाटील, ग्रामसेवक रमेश पाटील, सरपंच गोविंदा सोनवणे उपसरपंच सौ.कल्याणी पाटील ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाटील कल्पेश माळी, सागर पाटील, कर्मचारी सतीश पाटील, योगेश पाटील, रवींद्र पाटील माजी सरपंच भाईदास पाटील तसेच दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, नंदलाल पाटील, माजी सैनिक बापू पाटील, विजय पाटील सर व फार्मर कप मधील सहभागी श्रीकृष्ण गट, गुरुमाऊली गट झाशीची राणी गटातील महिलांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.