स्त्री शक्ती ही आदिशक्ती आहे . आदिशक्ती हे स्त्रीरुप आहे हे लक्षात घेतले तरी प्रत्येक भगिनींमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते . म्हणूनच ती पुरुष संस्कृतीमध्येही स्वतःचे अस्तित्व टिकवून खंबीरपणे जीवन जगत आहे. स्त्री समर्थ आहे. अर्धनारी नटेश्वर यांचे प्रतीकात्मक रूप स्त्री पुरुषांचे जीवन आहे .क्षण भर जरी विचार केला तरी पुरुषांच्या जीवनातून स्त्री विचार काढला तर त्यांचे जीवन निरर्थक आहे . पुरुषांना जन्माला घालून स्त्रियांनी महत्त्वाचे स्थान तेथेच निर्माण केले आहे. त्यामुळे तिचे पहिले आदिशक्ती रूप रूप आईचे आहेत.या मातृरुपामध्ये ही पुरुषबीजाला नऊ महिने तिच्या गर्भात सांभाळून ,संस्कार करून प्रेम मांगल्य भरभरून ती देत आहे. त्याला जन्माला घालून आदिशक्ती तिचे काम पूर्ण करते यावरूनच पुरुषांनी लक्षात घ्यावे ते स्त्रियांचे मातृत्व हे सामान्य नसून त्यांना सृष्टीमध्ये येण्यासाठी आईनेच पुढाकार घेतला आहे. इथे प्रश्न निर्माण होतो की पुरुषांचे स्थान काय? दोघांचेही सारखेच महत्त्व असले तरी आई तिच्या ऊबदार गर्भगृहात त्याला सुरक्षित ठेेवते. आईचे उपकार कधीही फिटता येणे शक्य नाही. येेथेेच प्रत्येकाने म्हणावे आई थोर होते उपकार………!
स्त्रीचा पहिलाआदर करताना तिच्या मातृत्व करून तिला आधाराची गरज असतांना आधार दया. वृद्धापकाळात तिची सेवा करा.बालपणापासून तिने केलेले कष्ट लक्षात घेऊन तिचे मन जपायला शिका .हे फक्त पुरुषांनीच नाही तर सर्व भगिनींनी सुद्धा करावे . सा सुसाठीही हाच नियम आहे .खऱ्या अर्थाने तो आपला मातृदिन असेल आणि महिला दिनही असेल
अर्धनारीनटेश्वर या स्त्री-पुरुष रूपाला 8मार्चच्या शुभेच्छा देताना लक्षात घ्यायला हवे की साने गुरुजींच्या विचारानुसार विवाहाचा अर्थ काय तर विवाहानंतर स्त्रियांचे चांगले गुण पुरुषांनी घ्यावे आणि पुरुषांचे चांगले गुण स्त्रियांनी घ्यावे. खूप सखोल अर्थ गुरुजींनी सांगितला आहे . . म्हणून तर पूजा करताना पतीच्या हाताला हात लावून पुजा करायला सांगितले जाते की तुझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये मी तुझ्याजवळच आहे .पाठीशी आहे. प्रत्येक पुरुषाने पत्नी च्या सहकार्याला मनापासून धन्यवाद द्यावेत. कााण आई-वडिलांना सोडून नवीन घरामध्ये नवीन माणसांबरोबर आयुष्यात काढणे हे सोपे नसते तरी महिला वर्ग ही कसरत करतच आहे.
पुरुष वर्गाला हे कधीच कळणार नाही.कारण त्यांच्या माणसांना सोडून लग्नानंतर पुरुष सासरी जात नाही. लहानपणापासून ज्यांनी खूप प्रेमाने सांभाळले त्या आई-वडील ,बहीण भावंडे यांना सोडून अचानक दुसरीकडे कायमचे राहायला जाणे हे किती मोठे दिव्य आहे हे पुरुषांना कळणार नाही. हा एक प्रकारे त्याग आहे. आणि गंमत अशी की भांडण झाल्यावर तो सहज म्हणतो तू काय केलेस आणि असे शब्द ऐकताच सर्व स्त्री वर्गाची संतापाची लाट उसळून येते कारण लग्न झाल्यापासून तिची
तडजोड सुरू झालेली असते. कशासाठी तर तिच्या सुखी संसारासाठी ,नवऱ्यासाठी ,मुलांसाठी सासरच्या माणसासाठी हे सर्व काही ती करते .स्त्रीचे जीवन म्हणजे खरोखर एक तपस्या असते .
त्या तपस्येला पुरुषांनी जाणून घेतले तर त्याचे रूपांतर आनंदात नक्कीच होते . असे जेव्हा घडते तेव्हाच
त्या तडजोडीचे रूपांतर समर्पण आणि एकरुपतेमध्ये होते . प्रत्येक क्षण तिला तिच्या संसारासाठी आनंदी करायचा असतो .त्यासाठी ति ला तिच्या पतीची, मुलांची आणि सासरच्या लोकांकडून सहकार्याची अपेक्षा असते .यांचे सहकार्य मिळाले तर तिला जीवन यशस्वी झाल्याचा आनंद होतो . स्त्री जीवनातील
संघर्ष सहन करते पण ती जेव्हा नम्र होते तेव्हा त्याचा अर्थ काहीजण ती दुबळी झाली ,कमकुुवत झाली असे समजतात पण ती कधीच दुबळी आणि कमकुवत नसते. प्रसंग आला तर ती दुर्गा ,काली ,रणचंडिका
आणि झाशीची राणी बनते तेव्हा मात्र तिचे हे रूप सर्वांना अपरिचित असते. तिच्या या कणखर रूपालाही सलामच आहे.
स्त्री कुटुंबाचा आधारस्तंभ आहे
सर्व आर्थिक व्यवहारामध्ये स्त्रियांल लक्ष घालत असतात. काटकसर करतात .पैशाला पैसे जोडून ठेवतात आणि वेळप्रसंगी ते देऊन मदतही करतात .तेव्हा तिचे चातुर्य लक्षात घेण्यापेक्षा तिने पैसे चोरून ठेवले असा चुकीचा अर्थ लावला जातो, तेव्हा ती चिडते
तिला असा कलंक लावणे अनपेक्षित असते .स्त्रियांमध्ये व्यवहार चातुर्य असते शौर्य असते .स्त्रियां कर्तबगार असतात असतात. इतिहासामध्ये जरा डोकावून बघा स्त्रियांनी विदुषी ते रणांगण गाजवणारी योद्धा म्हणून इतिहास घडवलेला आहे. मुलांवर संस्कार करून आदर्श पिढी स्त्रियांनीच निर्माण केली आहे .आदर्श पुरुष असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शिवबाला घडवणाऱ्या माॅसाहेब जिजाऊ आठवताा .स्त्रियांमध्ये असलेल्या गुणांचा पुरेपूर वापर कुटुंबाने आणि समाजाने करायला हवा. स्त्री आदर्शच आहे फक्त आपली तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी. ही दृष्टी मानवी जीवन आनंदी होण्यास नक्कीच मदत करते मग ती स्त्री आई, बहीण ,मुलगी, पत्नी, शिक्षक ,डॉक्टर अशा कोणत्याही रूपामध्ये असो ती जीवनदायिनी आदिशक्ती आहे हे सर्वांनी समजूून घ्यायला हवे .स्त्रियांना हीन समजू नका . तिला तुच्छ समजणारा काळ आता गेला. त्यांच्याशी प्रेमाने आपुलकीने ,विनम्रतेने ,सहानुभूतीने वागून आपले जीवन सुखी करा. कारण की पुरुषांच्या प्रत्येक दुःखात सुखात ती सहभागी असते .अत्यंत काटकसरीने पुरुषाचा संसार करून त्याला त्याच्या पडत्या काळात हिम्मत देते. घराण्याचे नाव उज्वल करते. मुलांसाठी अहोरात्र झटते. तिला पुरुषांकडून फक्त एवढीच अपेक्षा असते की तू मला किती चांगली साथ दिली ….देते….. परंतु बऱ्याच पुरुषांना असे शब्द उच्चारायलाही वेळ नसतो ,,,,,,किंवा अहंंकार आडवा येतो …..,तिचे कौतुक केले तर तिचे वर्चस्व वाढेल ही भीती असते परंतु ही विनाकारण घेतलेली भीती आहे हे लक्षात ठेवा.तिची अपेक्षा फक्त नवऱ्याचे कौतुकाचे शब्द ऐकायची असते हे ऐकले तर तिचे मन उत्साहाने पुन्हा कामाला लागते आणि नवीन ऊर्जा तिला मिळते म्हणून पुरुषांनी8 मार्च फक्त एकच दिवस स्त्रियांचा गौरव न करता तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या सहचारिणीचे काही वेळा तरी कौतुक करा .बस एवढे झाले की 8मार्च साजरा झाला. तिच्या अस्तित्वाचे भान ठेवा. तिची अस्मिता जाणून घ्या. असा प्रत्येक दिवस आठ मार्चचा व्हावा ही प्रत्येक पुरुषाकडून स्त्रियांची अपेक्षा असणारच आहे कारण की ती स्वतःसाठी जगत नसून पुरुषाच्या संसारासाठी जगते. तुम्ही म्हणाल की मग ती स्वतःसाठी जगत नाही का? अगदी खरे आहे बंधूंनो! तिचे जीवन तिचेही आहेच पण तिने तिचे जीवन जगताना, तुमच्या नावाचे कुंकू लावताना आणि मंगळसूत्र बांधतांना तिने तुम्हाला अर्पण केले आहे हे क्षणभरी विसरू नका , पण जेव्हा ते विसरले जाते तेव्हा स्त्रियांना शिव्या देणे, त्यांची लायकी काढणे, त्यांच्या माहेरचा उद्धार करणे, त्यांना हिनवणे, तू काहीच करत नाहीस असे बोलून तिला कमकुवत दाखवून देणे हे चुकीचे आहे अशा कुटुंबांमध्ये सतत वाद होत असतात म्हणून सुसंवाद होण्यासाठी समजून घ्या. पत्नी म्हणून तिच्या आदर करा. तिच्या कर्तृत्वाला नवीन दिशा द्यायला मदत करा .बऱ्याच भगिनींना लग्नानंतर नवऱ्याने आणि सासरच्या माणसांनी शिकवले आहे .मी सुद्धा त्यातील एक आहे( माझे लग्न दहावीनंतर झाले. मी लग्नानंतर शिक्षण घेतले .आज मी डॉक्टरेट होऊन प्रोफेसर म्हणून सेवानिवृत्त झाले . कर्मयोगी संत गाडगेबाबाच्या जीवन कर्तृत्वावर मी पीएचडीचा अभ्यास केला याचा मला आनंद आहे मला माझ्या पतीची आणि परिवाराची साथ लाभली म्हणून हे मी करू शकले )स्त्रियांना पतीने आणि सासू-सासर्यांनी केलेले सहकार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. स्त्रियांनी सुद्धा त्यांचा आदर करायला हवा. प्रत्येक स्त्रीने नवऱ्याचा आदर सन्मान करून त्याच्या प्रतिष्ठेला जपायला हवे .पुरुषाला हेच तर हवे असते. माहेरच्या किंवा सासरच्या लोकांसमोर यांना कधी अनादर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी तेव्हाच नवऱ्याला सुद्धा पत्नी विषयी आदर वाटू लागतो . पती-पत्नीचे नाते हा व्यवहार नाही तर ते एक पवित्र ऋणानुबंध आहेत. आणि ते रेशमाच्या धाग्याप्रमाणे जपणे हे दोघांचीही जबाबदारी आहे. वाद झाला तर शांततेने चर्चा करून एकत्र बसून सामोपचाराने मिटवायला हवा, त्यामध्ये तिसऱ्याची गरज नको. तरच त्यांचे संसार चांगले होतात .मिठाशिवाय अन्नाला चव नाही म्हणून थोडेफार भांडण चालते पण ते विकोपाला जाणार नाही याची काळजी दोघांनी घ्यावी. हेच तर जीवन आहे .या जीवनामध्ये तुम्ही एकमेकांचे महत्त्व आणि मन सांभाळायचे आहे. त्या मनाला चीड, राग ,द्वेष याची लागण होऊ नये म्हणून एकमेकांविषयी घरातील व्यक्तींनी किंवा नातेवाईकांनी कितीही काही सांगितले तरी पती-पत्नी आपले मन कलुषित होऊ देऊ नये किंवा मनात चुकीचा विचार आला शांतपणे बोलली तो शंका समाधानाने दूर करावा. आपण सहज बोलून जातो की मला इतका राग येतो पण त्या रागाला अर्थ काय???? याचा क्षणभर विचार करा.आज कोर्टामध्ये होणारी हजारोंच्या घरात गेलेली घटस्फोटांची संख्या बघून हा मुद्दा मला मांडावासा वाटला . हा कुटुंब टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे .मुलं असून सुद्धा घटस्फोट होत आहेत आणि त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही मुलांचा विचार केला जात नाही .कुटुंब व्यवस्थेला तडा जात आहे आणि दुसरीकडे आपण सर्व भगिनी 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून कार्यक्रम साजरे करत आहोत. कार्यक्रम नक्की साजरे करा परंतु ८ मार्च या महिला दिनाला महिलांच्या समस्या चर्चेला घ्या त्या जाणून घ्या. एकमेकांना सहकार्य करा .काही अडचणी असतील तर एकमेकींना सांगून त्या सोडवा . हा खरा आठ मार्च होणार आहे
8 मार्चच्या शुभेच्छा अविवाहित मुलींसाठी-……..
1) अजून आमचे लग्नाचे वय नाही
( हा प्रश्न स्वतःच्या मनालाच विचारा की लग्नाची वय कोणते)
2) आई वडिलांना सांगतात की अजून एक दोन वर्ष थांबा….
( आई-वडिलांकडे बघून त्यांचे टेन्शन, वाढणारा बीपी, शुगर, मानसिक अस्वस्थता गांभीर्याने विचारात घेऊन किती वर्ष थांबायचं त्याचा विचार तुम्हीच करा )
3) माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट करून मला शिक्षण दिले मला त्यांचे नोकरी करून पैसे परत करायचे आहे मग लग्न करणार….( ….कोणत्याही आई-वडिलांची परतफेड पैशाने करता येत नाही वेळेवर चांगल्या मुलाशी लग्न करून मुलींचा संसार सुखी झाला की हेच आई-वडिलांना समाधान असते)
3) मुली नोकरी करत आहे 60, 70 80 हजाराचे पॅकेज आहे तर मुलाचे एक लाखापर्यंत पॅकेज हवे.
( मुलींनो अभिनंदन तुम्ही स्वतः आत्मनिर्भर होऊन कमावणाऱ्या आहात. मुलाला 40 जरी भेटले तरी समाधान मानून दोघांचे एक लाख झाले ,तरी पुढे फक्त जीवनसाथी तुम्हाला साथ देणारा ,सुखी ठेवणारा हवा अशी दृष्टी ठेवा. तुमच्या आई-वडिलांचा सन्मान करणारा हवा हे बघा . या अट्टाहासफाई तुमचे विवाहाचे वय वाढत आहे)
4) दिसण्यात कमी असला तरी चालेल पण तो असण्यात असला पाहिजे या विचाराने जोडीदार शोधावा यापेक्षा चांगला मिळेल असे म्हणत अनेक स्थळ हातून जात आहे
5) सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्य, जन्म कुंडली, पत्रिका ,मंगळ ,ग्रहदोष यामुळे आपण
फक्त स्थळ शोधतच आहोत हे कुठेतरी थांबवून गाडगेबाबांच्या विचारांनी चालायला हवे.
.. ……8 मार्चच्या दिवशी कित्येक वर्षापासून मी माझे विचार व्यासपीठावरून मांडत आहे परंतु स्त्रियांचे जीवन मांडण्यापेक्षा स्त्रियांच्या जीवनातील समस्या यावर विचार मांडले तर ….हा विचार मनात येऊन मी जे आजच्या काळात दिसले तेच आपल्या समोर मांडलेले आहे . समाजातील भ्रूणहत्या ,बालविवाह, मुलींचे शिक्षण ,लग्न आणि लग्नानंतरचा घटस्फोट, अपरिपक्व वयातील प्रेमविवाह, विधवांचा विवाह, परित्यक्तचाविवाह, व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न समाजासमोर आहे आहे या प्रश्नाने खरोखर मन अस्वस्थ होते. लिहिण्यासारखे खूप आहे परंतु हा लेख अगोदरच मोठा झाला आहे म्हणून येथेच लेखणी थांबवते काही प्रश्न असतील तर नक्की वैयक्तिक फोन करा .एक लेखिका समाजातील समाजसेविका म्हणून आपल्याशी हितगुज केले आहे आपल्याला योग्य वाटत असेल तर नक्कीच विचार करा अन्यथा प्रत्येक जण आपल्या विचाराने स्वतंत्र आहे….
माझी लेखणी आणि वाणी ,विचार मानवसेवायोगी गाडगेबाबांना समर्पित….
8मार्च 2023च्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक आगळ्यावेगळ्या शुभेच्छा..