शेवटी राणांनी शेपुट घातली
बच्चुभाऊंचे बंड थंड झाले ?
आ.रवी राणा यांनी राणा भीमादेवी थाटात आरोपांची राळ उठवून दिली,तेंव्हा हे प्याल्यातले वादळ ठरणार, हे जवळपास निश्चित झाले होते.शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनमत अनुकूल असल्याने व प्रचंड सहानुभूती निर्माण झाली असल्याने त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राणा व बच्चु यांना दाणे टाकून झुंजविण्यात आले. रवी राणा हे फडणवीस यांचे समर्थक असल्याने त्यांनी बच्चु कडूंवर टोकाची टीका करणे फडणवीस सहज रोखू शकले असते,परंतू बच्चु कडू यांचे रोजच्या रोज वस्त्रहरण होत असताना,फडणवीस मज्जा बघत होते. बच्चुभाऊ यांनी 1 तारखेचा अल्टिमेटम दिला असताना त्याआधीच ही मिटवामिटवी करू शकले असते.परंतू त्यांना बच्चु कडूंवर लगाम घालण्यासाठी हा कोंबड्या झुंजवत ठेवल्या,बच्चुभाऊ कडू यांचे पुरते वस्त्रहरण करून झाल्यावर रवी राणा काय बोलले ? तर मी माझे शब्द मागे घेतो.याचा अर्थ त्यांनी बच्चु भाऊंवर केलेले आरोप खोटे होते, असा होत नाही.त्यांनी माफी मागितलेली नाही,फक्त शब्द मागे घेतले,असे मोघमपणे म्हटले आहे.
वास्तविक बच्चु कडू यांना पहिल्याच मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देणे अपेक्षित होते,परंतू 10 अपक्ष आमदारांचे नेतृत्व करणा-या कडूंना वाटाण्याच्या अक्षता दाखवून अलगद बाहेर ठेवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. त्यांनी पुन्हा पुन्हा मंत्रीपदाचा आग्रह धरून सरकारला वेठिस धरू नये,यासाठी पाहुण्याच्या काठीने साप मारण्यासारखे फडणवीस यांच्या मार्फत रवी राणाच्या काठीने बच्चु कडूंवर प्रहार करून घायाळ करण्याचा हा डाव होता.
आत्ता रवी राणा यांनी शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो,इतके बोलून बच्चु कडूंचे बंड थंड करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. बच्चु कडूंनी देखील सर्व काही ओके असल्याचे उघडपणे जाहिर केले नसून ते उद्या निर्णय जाहिर करणार आहेत. सद्या या वादाची अवस्था तेरी भी चुप मेरी भी चुप,अशी आहे.आत्ता बच्चु कडुंना मंत्री पदाचे गाजर देऊन गप्प बसवतात की बच्चु कडू प्रहार करून मिंधे सरकारला घायाळ करतात,हे लवकरच कळेल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470