राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले गर्दीचे राज्य महामार्ग २५ वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेण्यार – नितीन गडकरी
राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले गर्दीचे राज्य महामार्ग २५ वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत असोसिएशन ऑफ द नॅशनल एक्स्चेंजेस मेंबर्स ऑफ इंडियाच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते. राज्य महामार्ग चार किंवा सहा पदरी रस्त्यांमध्ये विकसित केले जातील, आणि या महामार्गावर पथकर आकारणी करुन, केंद्र सरकार ही गुंतवणूक भरुन काढेल, १२-१३ वर्षांत पथकर आकारणीतून ही गुंतवणूक व्याजासह पूर्णपणे भरून निघेल, असं त्यांनी सांगितलं. देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला केंद्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे, असं मंत्री गडकरी यावेळी म्हणाले.