कर्मयोगीचा अभिनव उपक्रम एक साडी माझ्या दुःखीकष्टी विधवा ताईला…..
नवरात्रात ५१ विधवा महिलांना साडीचोळी देऊन सन्मान..
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सेवाभावी संघटन आहे. २०१९ पासून कर्मयोगी नवरात्रात विधवा महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करत आहे. आपल्या देशात नवरात्रात देवीला साडीचोळी देऊन ओटी भरण्याची प्रथा आहे. परंतु देवी तर जगाची पालनकर्ता आहे तिला साडीची गरज आहे का? त्यामुळे देवीला अपेक्षित जे आहे अशा पध्दतीने कृती करत ज्या विधवा महिलांना धार्मीक विधी मध्ये दुय्यम स्थान दिले जाते अशा विधवा महिलांना नवरात्रात साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आतापर्यंत हा उपक्रम ९ दिवस गावोगावी जाऊन राबविल्या जात होता परंतु या वर्षी
दि. २ ऑक्टोबरला गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व नवरात्र याचे औचित्य साधत केईसी ट्रेनिंग सेंटर बुटीबोरी येथे कार्यक्रम आयोजित करून एक साडी माझ्या दुःखीकष्टी विधवा ताईला या उपक्रमा अंतर्गत
५१ विधवा महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाची विशेषतः म्हणजे व्यासपीठावर सुद्धा देवीच्या स्वरूपात ९ कर्तृत्ववान महिलांना स्थान देऊन त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा याची प्रतिमा देवुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्पना बिसेन नागपूर, उद्घाटक वत्सला ढोले हिंगणा, प्रमुख उपस्थिती राजश्री टिपले नागपूर, मुक्ता खोब्रागडे हिंगणा, सुनीता खोब्रागडे हिंगणा, प्रांजली मालोदे बुटीबोरी, शांता झलके हिंगणा, अपर्णा आडकीने आसोला सावंगी व लक्ष्मी समर्थ देवळी सावंगी येथील ९ कर्तृत्ववान महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कल्पना बिसेन म्हणाल्या की कर्मयोगी एक साडी माझ्या दुःखीकष्टी विधवा ताईला या उपक्रमातुन समाजाला नवीन शिकवण देत आहे. आज विधवा महिलांच्या खचलेल्या मनाला प्रेमरूपी आधाराची गरज आहे. ती गरज या भागात कर्मयोगी आपल्या प्रामाणीक कृतीतून मोठ्या प्रमाणात करत अनेक गोरगरिबांचा आधार ठरत आहे.
या कार्यक्रमात ज्या विधवा महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले, तेव्हा अनेक महिला भावुक झाल्या व म्हणाल्या इतका आदरयुक्त व प्रेम देणाऱ्या सोहळ्याने आम्ही भारावून गेलो आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली..
