सहकारमंत्री ना. अतुल सावे यांचेकडे धुळे भाजपा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी
अटल सहकारी संस्थांना अर्थ सहाय्य योजनेस निधी द्यावा
शिरपूर : महाराष्ट्र शासनाने सन २०१९ मध्ये नाविन्यपूर्ण सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना राबविण्याबाबत दिनांक २ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे यांची सदर योजना अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार सदर योजना अंमलबजावणीसाठी शासन निर्णया प्रमाणे राज्यस्तरीय समितीच्या जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०१९ मध्ये तत्कालीन माजीमंत्री महोदय सहकार यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी सभा झाल्या आहेत. सदर योजनेसाठी सन २०१८-२०१९ मध्ये आमच्या संस्थांना निधी मिळाला नाही. परंतु आता आमच्य संस्थांना निधी मिळावा व प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. तसेच राज्यातील या सर्व संस्थाना निधी देण्यात यावा अशी मागणी सहकार मंत्री ना. अतुल सावे यांचाकडे करण्यात आली आहे. धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी सहकार मंत्री ना. अतुल सावे यांची मंत्रालय मुंबई येथे दि.२८ सप्टेंबर रोजी भेट घेवुन मागणीचे सविस्तर निवेदन सादर केले आहे. मंत्री ना. अतुल सावे यांनी यावेळी तीन ते चार महिन्यात या संस्थांना मुदतवाढ देवुन योग्य ती निधी देवु असे आश्वासन दिले. धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी राज्यातील अटल संस्थांचा वतीने निवेदन दिले असुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, या योजने मधील तरतुदी नुसार १२.५% कर्ज व अनुदान हि मिळावे या बाबत प्रस्ताव महामंडळाकडे सादर केलेले आहेत. सदर योजने अंतर्गत कर्ज हिस्सा १२.५०% व अनुदान हिस्सा ७५% प्रमाणे सदर संस्थांना कर्ज व अनुदान वितरण करणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी हि अरुण धोबी यांनी मंत्री ना. सावे यांचाकडे केली आहे.