शिवसेना विरोधकांची मोट बांधण्याचा केविलवाणा प्रयत्न : गद्दार हे गद्दारच असतात….
तितरांची फौज बनवून वाघाची शिकार करता येत नाही,हे कोणीतरी एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे. दही हंडी च्या इव्हेंटचा राजकीय आखाडा करून झाला. थरांवर थर रचून झाले पण उपयोग काही झाला नाही. ही गद्दारांची हंडी सर्वोच्च न्यायालयच फोडू शकते,म्हणून आजचे मरण उद्यावर ढकलत तारीख पे तारीख चालले आहे.त्यात तो भरत गोगावले बोलूनच गेला चार पाच वर्षे निकाल लागणार नाही ? जणू काही हेच सर्वोच्च न्यायालय चालवतात.
नाही तरी एकनाथ शिंदे गुवाहत्तीत बोललेच होते,आपल्या मागे महाशक्ति आहे,ती आपल्याला काही कमी पडू देणार नाही. ही महाशक्ति काही भोळीभाबडी नाही,या गद्दारांना फुकटचे पोसायला. गुजराती व्यापारी आहेत, ते देतात एकपट व काढून घेतात 100 पट. तुम्हाला गद्दारी करायला खोके,सत्तेचे गाजर दिले पण तुमची जनमानसातील प्रतिमा गद्दार व पक्षद्रोही अशी करून तुमचे पुरते वस्त्रहरण केले. 50 खोके,माजले बोके,बाकी सर्व ओके,किंवा गद्दार गद्दार म्हणून विधानभवनाच्या पाय-यांवर जे स्वागत झाले ते देशातील व परदेशातील लोकांनी पाहिले. याने तुमची जी इज्जत गेली ती कशी भरून काढणार ?
दही हंडीत राजकारण केले,
गणेशोत्सवात शिवसेना विरोधकांच्या भेटीच्या जोर बैठका सुरू आहेत, नंतर दसरा मेळावा हायजॅक करून एका अर्धशतकाहूनही अधिक काळ सुरू असलेल्या परंपरेस सुरूंग लावण्याचा नतद्रष्टपणाचा प्रयत्न सुरू आहे. कितीही आदळ आपट करा, बुंदसे गयी वो हौदसे नही आती ! हे कायम लक्षात ठेवा.काही काळासाठी सत्ता भोगाल, ऐशोआराम कराल,पण इतिहासात तुमची नोंद गद्दार म्हणूनच होईल. कोणी जयचंद म्हणून हिणवतील, कोणी अनाजी पंत म्हणतील, गद्दारांच्या पंक्तित तुमची गणना होईल.
दसरा मेळाव्यात तुमच्याकडे प्रभावी वक्ता नाही म्हणून भाड्याने भोंगे आणाल,पण अंतरात्म्याचा आवाज कुठून विकत आणणार ? हिंदूत्ववादी म्हणवता व गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राचिन गणेश मंदिराच्या लाद्या उखडता, कल्याण च्या गणेशोत्सव मंडळाचा देखावा पोलीस बळाचा वापर करुन जप्त करता, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करता ?
पापाचा घडा भरतो, रावणाचा अंत होतो,तसा या आतंकवादी, अतिमहत्वाकांक्षी व गद्दारी,होय गद्दारी करून मिळालेले ऐश्वर्य औटघटकेचे ठरणार,नंतर भाजपा तुमची जी दुरावस्था करेल ती आमच्याने देखील पाहवणार नाही !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470