सत्तेच्या हव्यासापोटी एकनाथ शिंदे यांनी सुमारे 40 आमदारांना फितवून व मंत्रीपदाची आमिषं दाखवून शिवसेनेपासून त्यांचे विलगीकरण केले.इडी, सीबीआय,आयटी पासून बचाव करण्याचे वॉशिंग मशीन म्हणून ख्याती मिळवलेल्या भाजपाच्या गंगेत सर्व पापांचं निरसन होते व सर्व चौकश्यांचा ससेमिरा थांबतो,असे सांगत स्वतः सह इतरांना भाजपाचे दास्यत्व पत्करायला लावणारे फुटीर शिवसेनेशी दगाफटका करून गेले,त्याचा खेद वा खंत करण्याची शिवसेनेला गरज नाही.कारण या लोकांनी स्वतःची कबर स्वतःच खोदली आहे. भाजपा त्यांचा उपयोग “युज अँण्ड थ्रो” सारखा करणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.ते कुठलाही कुडबुड्या जोतिषीही सांगेल.या फुटीरांबरोबर गेलेल्या कार्यकर्ते व पदाधिका-यांतील 80 टक्के लोक हे दबावतंत्रामुळे नाईलाजास्तव गेले आहेत. अनधिकृत बांधकामं तोडणं,अतिरिक्त बांधकामं तोडणं, एमआरटीपी अंतर्गत कारवाई करणे, जुने गुन्हे उकरून काढण्याची धमकी देणे,या मार्गाने वळवलेले शिवसैनिक व पदाधिकारी हे नाईलाजाने गेले आहेत.ठाणे जिल्हा परिसरात याचे प्रमाण जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे बंडखोरांचे अग्रणी एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यक्षेत्र व प्रभाव क्षेत्र ठाणे व पालघर जिल्हे आहेत. 2004 पासून आमदार,विरोधी पक्ष नेते, जिल्हा प्रमुख, दोन वेळा कॅबिनेट मंत्री व आत्ता मुख्यमंत्री झाल्याने असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक त्यांच्या संपर्कात आले,त्यांच्या काळ्या व गोरखधंद्यांना तीन महिन्यापुर्वी पर्यंत जे संरक्षण व प्रोत्साहन देत होते, ते आपल्या फुटीर गटात सामिल होत नाहीत असे दिसताच त्यांनी आपली नखं बाहेर काढली. त्यामुळे अनेकजण पाण्यात राहून मगरीशी वैर नको,या तत्वाने फुटीर गटास शरण गेले. परंतू त्यांची अगतिकता त्यांच्या Body langauge वरून स्पष्टपणे दिसत आहे. ज्या पक्षाशी चार दशकांहून अधिक काळ इमान राखले त्यापक्षाच्याच विरूद्ध गटात सामील होताना त्यांना होणा-या वेदना ते उघडपणे बोलू शकत नसले तरी या गद्दारांच्या पापाचा घडा लवकरात लवकर फुटण्याची वाट तुमच्या आमच्या पेक्षा असे नाईलाजाने गेलेले पदाधिकारी व शिवसैनिक अधिक तीव्रतेने पाहत असतील.त्यामुळे अशा वाट चुकलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांना आपण दुखावता कामा नये.कारण जेंव्हा शिंदे गटाची हंडी फुटेल,तेंव्हा गुलामगिरी व दहशतवादातून मुक्त झालेले गोविंदाच यर्वप्रथम जोशात नाचतील.आपण तर रावणाचे दहन झाल्याप्रमाणे आनंदोत्सव साजरा करूच. तो क्षण फार दूर नाही,हे मात्र नक्की !!
दिलीप मालवणकर (ज्येष्ठ पत्रकार)
9822902570