राज्याच्या ५१ तालुक्यांमधल्या ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी येत्या १८ सप्टेंबरला मतदान
(निलेश गायकवाड)
पावसाचं प्रमाण कमी असलेल्या 51 तालुक्यांमधल्या 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह, थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत ही घोषणा केली.
निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार येत्या 18 तारखेला निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत, सुट्टीचे दिवस वगळता, उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
त्यांची छाननी 2 सप्टेंबरला होईल. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबरपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगानं शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशी माहिती मदान यांनी दिली.