करमाळा प्रतिनिधी :- किल्ला विभागामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना वॉर्ड मध्ये बोलावून प्रत्यक्ष नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दाखविल्या व याबाबत त्यांना लेखी निवेदन देऊन समस्या दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी लागेल याबाबत सविस्तर चर्चा केली.
सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गल्ली बोळापर्यंत घंटागाडीचा आवाज जात नसल्याने व दैनंदिन घंटागाडी येत नसल्याने लोकमान्य टिळक पुतळा परिसरासमोर दैनंदिन कचरा कुंडी निर्माण झालेली असल्याने पुतळयाचे पावित्र्य धोक्यात आलेले आहे. तसेच सध्या पावसाळयाचे दिवस असून पुतळयावर मोठया प्रमाणात गुलमोहराच्या फांदया आलेल्या आहेत त्यामुळे फांदी तुटल्यास पुतळयाला धोका निर्माण होवू शकतो. राष्ट्रसंत गाडगे बाबा समाज मंदीरासमोर पुरूषांच्या लघुशंकेची जागा असल्याने व सदर जागेची कधीही स्वच्छता होत नसल्याने सदर परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे सदरचे लघुशंकेचे ठिकाण बंद करून सदरची जागा इतरत्र स्थलांतरीत करावी.
तसेच महिलांसाठी किल्ला विभाग येथे महिला भवनची निर्मिती करण्यात आलेली होती. परंतु नगरपरिषदेच्या दुर्लक्षपणामुळे सदर महिला भवनची आजतागायत कोणतीही डागडुजी झालेली नाही. त्यामुळे महिलांना कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी जागा उपलब्ध नाही. सबब सदर महिला भवनची जागाही तात्काळ दुरूस्त करून घेणे गरजेचे आहे.

किल्ला विभागातील 90 टक्के गटारी हया जुन्या असल्याने त्या मोडकळीस आलेल्या आहेत. थोडा जरी पाऊस झाला किंवा थोडी जरी गटार तुंबली तरी गटारीतील पाणी नागरिकांच्या दारात, घरात जात असल्याने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
किल्ला विभागमध्ये पुरातन कारंजे विहीर असून सदर विहीरीची आजपर्यंत कधीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. याउलट संभाजी नगर येथील बारव विहीरीची नगरपरिषदेच्या वतीने अनेकदा स्वच्छता करण्यात आलेली आहे. तरी सदर कारंजा विहीरीची ही तात्काळ स्वच्छता मोहिम हाती घ्यावी अशा आशयाचे निवेदन यावेळी मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी किल्ला विभागातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
