औटघटकेचे मुख्यमंत्री एकटेच शिंदे यांचा आत्ता राग येण्याऐवजी किव येऊ लागली आहे. या माणसाने आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याबद्दल त्यांना मानलेच पाहिजे. आधी पक्ष प्रमुखाला गाफिल ठेऊन बंडखोरीसाठी सर्वपक्षीय आमदारांना तयार करणे, त्यांना आपल्याला महाशक्तिचा पाठींबा आहे,ते आपल्याला काहीही पडू देणार नाही,याची त्यांना खात्री पटवून देऊन बंडखोरीसाठी मन वळवणे, त्यांची पंचतारांकित हॉटेल मधे बडदास्त ठेवणे, मनोरंजनाची सोय करणे, त्यातून मध्यरात्री वेश बदलून येणा-या गनिमाशी खलबतं करणे, आम्हीच खरे निष्ठावंत व आमचीच खरी शिवसेना, आम्ही बंडखोर नाही तर क्रांतिकारी उठाव करणारे आहोत, सुरत,गुवाहत्ती,गोवा व मुंबई असा द्राविडी प्राणायाम करणे,मुंबईत येऊन अधिवेशन भरवण्यासाठी राज्यपालांना पटवणे, विधान सभा अध्यक्ष निवडणे, विश्वास ठराव मंजूर करुन घेणे,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे,इथवर सर्व मॅनेज करणे यात किती दमछाक झाली असेल ?? असे असूनही त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला नाही. याबद्दल शिंदेंना मानलेच पाहिजे.सर्वोच्च न्यायालयात उपसभापतींच्या 16 आमदारांच्या नोटीसला आव्हान दिले,सर्वोच्च न्यायालयाने मुदत काय दिली, एकनाथ शिंदेंच्या एकपात्री कॅबिनेटने भराभर निर्णय व अद्यादेशाचे फतवे काढले, त्यांचा वेग पि.टी. उषा व मिल्खासिंगच्या वेगाला लाजवणारा होता. एका महिन्यात 749 अध्यादेश काढणे ये-यागबाळ्याचे काम नोहे,तेथे पाहिजेत,शिंदेंच्याच जातकुळीचे!! या दोन पायाच्या रिक्षा सरकारने 36 दिवसांत काय केले तर आधीच्या सरकारचे निर्णय, आदेश, रद्द करण्याचा सपाटा लावला,त्यात मेट्रो रेल्वेसाठी आरेमधील कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना तो पुन्हा लागू करणे या सारखे अनेक लोकहितवादी निर्णय बदलले. ज्या मंत्री मंडळात एकनाथ शिंदे हे नंबर दोनचे मंत्री होते त्याच मंत्री मंडळाच्या ख-याखु-या कॅबिनेटचे निर्णय दोन चाकाच्या रिक्षा कॅबिनेटमध्ये बदलले गेले. सर्वात कहर म्हणजे ज्या नगरविकास विभागाचे ते कॅबिनेट मंत्री होते,त्याचाच महानगरपालिका व नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचा निर्णय फक्त भाजपास प्रतिकूल / गैरसोईचा होता म्हणून बदलला. त्यात महाराष्ट्भर दौरे आणि दिल्लिश्वराचे फर्मान आले कि धुम ठोकणे,तिथे तासनतास प्रतिक्षा करीत तिष्ठत राहणे,आपल्या सोबत आलेल्या व मोहपाशात अडकलेल्या आमदारांची मोट सूटून विखरू नये यासाठी मंत्री मंडळाच्या विस्ताराचे गाजर दाखवत राहणे,किती किती म्हणून घालमेल ,ओढाताण व कुतरओढ. त्यातून सर्वोच्च न्यायालयाचा एकंदरीत रोख पाहता,पायाखालची वाळूच सरकत असताना किती सहन करायचे ? मग तब्येत बिघडणार नाही तर काय होणार ?बरं एकनाथ शिंदेंचा हा आजार शारिरीक आहे,मानसिक आहे की, राजकीय आहे, हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेस कळत नाही. जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती डॉक्टरचा सल्ला घेईल व इलाज करून घेईल परंतू येथे तर डॉक्टर ऐवजी वकिलाचा सल्ला घेतला जात आहे. निष्णात विधीज्ञ उज्वल निकम यांना सल्ला द्यायला नंदनवनात पाचारण करण्यात आले होते.अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्या सारखी एकनाथ शिंदे यांची गत होऊ नये !
दिलीप मालवणकर
9822901470