आषाढी वारीसाठी यंदा ४५० हून अधिक दिंड्या सहभागी
(निलेश गायकवाड)
महाराष्ट्रात, आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहोळ्यानं काल आळंदीहून पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. अलंकापुरीमध्ये जमलेल्या हजारो भाविकांनी दोन वर्षांनी हा सुख सोहोळा प्रत्यक्ष अनुभवला.
टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या 191 व्या पालखी सोहोळ्यानं आळंदीहून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. कोरोना प्रादुर्भावामुळं घेतलेल्या दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर यंदा पुन्हा सुरु झालेल्या आषाढी पायी वारीसाठी इंद्रायणीतीरी भाविकांचा महासागर लोटला होता.
कपाळी चंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशीच्या माळा घालून खांद्यावर भगव्या पताका घेतलेल्या लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने अवघी अलंकापुरी अनोख्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. हा पालखी सोहोळा आता पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. यंदा 450 हून अधिक दिंड्या यात सहभागी झाल्या आहेत.
जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणे शहर सज्ज झालं आहे. पुणे महापालिकेनं दोन्ही पालख्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी केली आहे.
पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच महापालिकेनं यंदा प्रथमच आरोग्य वारी ही संकल्पना राबवून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विशेष काळजी घेण्याची तयारी केली आहे.