यंदाच्या पालखीला 6 लाखांपेक्षा जास्त वारकरी:40 टक्के भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज
(निलेश गायकवाड )
महाराष्ट्रात कोरोना संकट आटोक्यात आल्याचे चित्र असताना पुन्हा सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गुढी पाडव्याच्या शोभायात्रेनंतर आता महाराष्ट्राला पंढरपुरच्या वारीची आस लागली आहे. यंदा 2 वर्षांनंतर पुन्हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा पायी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 40 टक्के भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज सांगितला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी यात्रेत 21 जून दिवशी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी सांगितले की, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माऊलींच्या पालखीच्या मार्गाची पाहणी करणार आहे.

यंदाच्या पालखीला 6 लाखांपेक्षा जास्त वारकरी
आषाढी पालखी सोहळा तब्बल दोन वर्षांनी पार पडणार आहे. याशिवाय यंदा माऊलीच्या पालखीसोबत 6 लाखांपेक्षा जास्त वारकरी चालत येणार असल्याने पाण्याचे अधिकचे टँकर आणि अधिकची आरोग्यव्यवस्था करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली आहे. सोहळ्याच्या प्रस्थानाला एक महिन्याचा वेळ असल्याने उरलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली आहे.
पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात
10 जूलैला आषाढी एकदशी आहे. या आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळे पायी वारीत खंड पडला होता.