अमळनेर- नगरसेवकसह तरुणांनी वाचवला विहिरीत पडलेल्या महिलेचा जीव
अमळनेर : बकरीसाठी चारा गोळा करायला गेलेल्या महिलेचा पाय घसरून एक महिला विहिरीत पडल्याची घटना ४ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली मात्र नगरसेवकासह दोन तरुणांनी वेळीच धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
मंगलाबाई महाले रा राजाराम नगर ही महिला बकरीसाठी चारा घ्यायला शहराच्या वाढीव हद्दीतील त्रिमूर्ती नगरात गेली असताना कठडे नसलेल्या विहिरीत महिलेचा पाय घसरून ती विहिरीत पडली. त्याचवेळी सायंकाळी फिरायला गेलेल्या राकेश महाजन याला ही घटना नजरेस पडली त्याने नगरसेवक प्रताप शिंपी याना फोन केला. ते देखील फिरायला आलेले असल्याने त्यांनी ही धावत जाऊन विहिर गाठली. महिला डुबक्या मारू लागताच तिने पाईप हातात धरून ठेवला होता. विहिरीतून बाहेर येणे अवघड होते. जवळच असलेल्या पुंडलिक युवराज महाले , संजू सोमा नाईक यांना बोलावून विहिरीत उड्या टाकायला सांगितल्या. ताबडतोब दोर व जेसीबी मशीन मागवण्यात आले. रवी ठाकूर , सूरज शिंपी , हर्षल पाटील , मधुकर चौधरी , अमोल चौधरी हे देखील मदतीला धावले. अतिशय अवघड विहिरीतून महिलेला बाहेर काढले. त्यांनतर दोन्ही युवकांना देखील काढण्यात आले. महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल दोघं तरुणांचे कौतुक होत असून जय हिंद व्यायाम शाळा तर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.