राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन
प्रतिनिधी-गणेश ननवरे
चालू गाळप हंगामात आतापर्यंत राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन होऊन देखील विदर्भ , मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही ऊस शिल्लक असल्यानं तिथले कारखाने आणखी काही काळासाठी सुरूच ठेवण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालयानं दिले आहेत.
यंदा उसाचंही जादा उत्पादन झालं असल्यानं साखरेबरोबरच इथेनॉलचेही अतिरिक्त उत्पादन घेऊन सुद्धा अजूनही ऊस शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात राज्यात आत्तापर्यंत १०८ लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून गेल्या वर्षीपेक्षा ते सुमारे १५ लाख टनांनी अधिक आहे. देशांतर्गत साखर उत्पादनात यावेळी महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशला मागे टाकून अव्वल स्थान मिळवलं आहे.दरम्यान ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.