करमाळा :
करमाळा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जमिनीचे उतारे, नकाशे व इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या गंभीर तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक शेतकरी आपल्या जमिनीचे नकाशे, उतारे व इतर अभिलेख मिळविण्यासाठी अनेक दिवसांपासून कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र, संबंधित कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना विनाकारण परत पाठविले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच, कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
भूमि अभिलेख कार्यालयाच्या परिसरात खाजगी एजंटांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पैसे दिल्यास काम लवकर होते, अन्यथा साध्या कामासाठीही अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते, असे गंभीर आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
करमाळा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशे, उतारे किंवा इतर कागदपत्रे मिळविण्यास अडचण येत आहे, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप (मो. ९०१११४८०७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, कार्यालयात कागदपत्रे उपलब्ध नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी करून “सदर नकाशे/उतारे आढळून येत नाहीत” असे लेखी स्वरूपात देण्याची मागणी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या कामाचा अधिकृत लेखी पुरावा उपलब्ध राहील.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शासकीय कार्यालयातील गैरप्रकारांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.