“भिगवण-राशीन उड्डाणपुलाच्या सर्विस रोडवर काटेरी झुडपांचा विळखा, शेतकरी आणि नागरिक त्रस्त”
“निकृष्ट कामामुळे जीवाला धोका; प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त”
—
(निलेश गायकवाड)
दौंड, दि. 9 ऑगस्ट 2026
भिगवण-राशीन रोड वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या सर्विस रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्विस रस्त्याला काटेरी झुडपांनी अक्षरशः विळखा घातला असून त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे शेतकरी आणि नागरिकांसाठी जिकरीचे झाले आहे.
सर्विस रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे आणि शेतात जाणे-येणे मोठे कठीण झाले आहे. रस्त्यावरच झाडे-झुडपे वाढल्याने कोणतेही चारचाकी वा दुचाकी वाहन नेणे शक्य होत नाही.
या गंभीर समस्येकडे भिगवण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
उड्डाणपुलावर जीवाला धोका
आज उड्डाणपुलावरील लोखंडी सळई आणि अँगल रस्त्याच्या वर आले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. फूटपाथवर गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
नागरिकांचा आरोप
भिगवण-राशीन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पुलावर पथदिवे बसवलेले नाहीत. सर्विस रोडचे डांबरीकरण करून त्यावर सिलकोट न करता बिल अदा करण्यात आले आहे. सतत सळ्या आणि चॅनल तुटून खड्डे पडत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
मा. अशोकराव गायकवाड, माजी सरपंच, खानवटे ता. दौंड म्हणाले, “ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा लवकरच ग्रामस्थ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहेत.”