अमळनेरच्या भूमीत साकार होणार सावित्री माय आणि जोतिबा फुले यांचे भव्य स्मारक!
२०१६ पासूनच्या मागणीला अखेर यश; नगरपरिषदेच्या सभेत जागा निश्चित करण्याचा ठराव मंजूर
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेरच्या सामाजिक आणि वैचारिक भूमीत आता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल पडले आहे. सन २०१६ पासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असून, ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अमळनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बसस्थानक जवळील गांधी नगर कॉर्नर परिसरातील जागेवर फुले दाम्पत्याचे स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तब्बल दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर झालेल्या या निर्णयामुळे फुलेप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज मंडळ यांसह अमळनेर तालुक्यातील फुलेप्रेमी नागरिकांनी या मागणीसाठी सातत्याने आवाज उठविला. “हे केवळ स्मारक नसून शिक्षण, समता, स्त्रीमुक्ती आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे प्रेरणास्थळ असावे,” अशी भावना समता परिषदेचे जिल्हा संघटक भिमराव महाजन यांनी व्यक्त केली. नगरपरिषदेच्या निर्णयाबद्दल समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनरावजी भुजबळ तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.