८० फुटी डीपी रोडने घेतला पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी; आता प्रशासन ठेकेदार उमेश शहा आणि चारही ठेकेदारांची कामाची ‘कुंडली’ तपासणार कां?
अमळनेर : विक्की जाधव.
८० फुटी डीपी रोडवरील अपूर्ण कामामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर शहरातील संताप आता उफाळून आला आहे. कालपर्यंत अपघाताची चर्चा होती; आता थेट रस्त्याचे काम, ठेकेदार, निधी, मंजूर आराखडा आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला असून, संबंधित ठेकेदार उमेश शहा यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
तर सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम हे देखील यापूर्वीच या डीपी रोड संधर्भात हायकोर्टाचे दार ठोकवले होते त्याची चौकशी सुरू असून यापूर्वी येथे खड्ड्यामुळे अपघात झाला… आता या प्रकरणात प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम काका पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे. या प्रकरणाची अधिकृत चौकशी का होत नाही? संबंधित ठेकेदार उमेश शहा आणि त्यांच्याशी संबंधित चार व्यक्तींना कोण पाठीशी घालत आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही, तर वेळ आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, आता या रस्त्याच्या कामाची संपूर्ण ‘कुंडली’ तपासण्याची मागणी पुढे आली आहे. कामासाठी किती कोटींचा निधी मंजूर झाला? प्रत्यक्षात किती काम झाले? कुठे-कुठे काम झाले? किती काम अपूर्ण आहे? ठरलेली डेडलाईन असताना काम वेळेत पूर्ण का झाले नाही? आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा अवस्थेत काम का सोडण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
यापुढे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ता शासनाच्या नियमांनुसार झाला का? मंजूर डीपीआर आणि प्रत्यक्ष काम यामध्ये तफावत आहे का? काही ठिकाणी गरज नसताना रस्त्याचे वळण बदलण्यात आले का? तसे बदल मंजूर आराखड्यात होते का? कामाची गुणवत्ता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी झाली होती का? या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी झाल्यासच ८० फुटी डीपी रोडच्या कामामागचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
या सर्व प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही झाली नाही, तर शहरातील एक राजकीय व्यक्तीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करून न्यायालयीन दाद मागण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता हा विषय केवळ नगरपालिका सभेपुरता मर्यादित न राहता न्यायालयाच्या दारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्यानंतरही जर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही, तर मग जबाबदारी कोणाची? हा प्रश्न सध्या अमळनेरकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ठेकेदार उमेश शहा आणि संबंधित चारीची ही भूमिका, रस्त्याच्या कामाचा दर्जा, निधीचा विनियोग आणि अपूर्ण कामामागील कारणे यांची चौकशी कधी होते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ८० फुटी रोड प्रकरणात पुढचा ‘ब्रेक’ प्रशासन लावणार की हे प्रकरण न्यायालयाच्या दारात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सविस्तर पुढे