१७० कोटींच्या कथित शालार्थ घोटाळ्याला न्यायालयाचा दणका; शरद शिंदे, मनोज पाटील सह १५ संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260809-WA0982

१७० कोटींच्या कथित शालार्थ घोटाळ्याला न्यायालयाचा दणका; शरद शिंदे, मनोज पाटील सह १५ संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले!

 

अमळनेर : विक्की जाधव.

राज्यभर गाजत असलेल्या १७० कोटी रुपयांच्या कथित बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याला नाशिक रोड सत्र न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी न्यायालयाने तब्बल १५ स्वतंत्र आदेश देत मनोज रामकृष्ण पाटील, शरद दयाराम शिंदे, विनोद तराळ यांच्यासह १५ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहाराच्या तपासाला आता अधिक वेग आल्याचे चित्र दिसत आहे..

न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या परिणामांवर कठोर निरीक्षण नोंदवले. शिक्षण व्यवस्था ही भावी पिढीच्या जडणघडणीचा पाया असून, त्यात भ्रष्टाचार रुजल्यास त्याचे परिणाम व्यापक असतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. हा प्रकार केवळ कागदोपत्री किंवा तांत्रिक अनियमितता नसून सरकारी निधी आणि जनतेच्या पैशांशी संबंधित गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण आदेशात करण्यात आले आहे.

शरद शिंदेच्या भूमिकेवरही न्यायालयाची विशेष नजर राहिली आहे. तपासात तो शैक्षणिक संस्थेचा संचालक तसेच मध्यस्थ म्हणून कार्यरत असल्याचे समोर आल्याचा उल्लेख आदेशात आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आवक रजिस्टर आणि नाशिक रोड पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून आठ शाळांमधील ५१ कर्मचाऱ्यांच्या नावांमध्ये फेरफार करून नोंदी घुसडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात कस्टडीयल चौकशीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

मनोज रामकृष्ण पाटीलशी संबंधित प्रकरणानेही संशयाचे धुके अधिक गडद केले आहे. बोरणार येथील सुयोग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक शाळा, बोरगाव येथील सर्वज्ञ माध्यमिक शाळा आणि पारोळा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक शाळेचा न्यायालयीन आदेशात उल्लेख आहे. यापैकी पारोळा येथील संबंधित शाळा प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याचा दावा आदेशात नमूद करण्यात आला आहे. पाटीलशी संबंधित ४८ कर्मचाऱ्यांपैकी २१ कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे तपासात समोर आल्याचेही न्यायालयीन नोंदीत नमूद आहे. जामीन फेटाळताना इलेक्ट्रॉनिक पुरावे, साक्षीदार आणि तपासावर परिणाम होण्याच्या शक्यतेचाही न्यायालयाने विचार केला. संशयितांकडे पद, प्रभाव किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क असल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो, तसेच इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमध्ये फेरफार किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायाधीश के. जी. जोशी यांनी आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निवाड्यांचाही आधार घेतला आहे.

दरम्यान, शिक्षक अतुल पवार आणि उमेश पवार यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. अमळनेर कनेक्शनमुळे आता तपासाची पुढची दिशा महत्त्वाची ठरणार आहे! या प्रकरणातील संशयित आणि शिक्षण संस्थांशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेमुळे अमळनेर परिसरातील शिक्षण क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे. कथित शालार्थ घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकेल, तसतशी आणखी कोणती नावे समोर येतात? शासनाच्या निधीतील कथित गैरव्यवहाराचा नेमका सूत्रधार कोण? आणि या प्रकरणाची व्याप्ती आणखी किती मोठी आहे? या प्रश्नांची उत्तरे आता तपास यंत्रणेच्या पुढील कारवाईतूनच स्पष्ट होणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!