“निरा भीमाचे 7 लाख मे. टन गाळपाचे लक्ष्य; रोलर पूजनाने हंगामाला सुरुवात – भाग्यश्री पाटील”
“निरा भीमा कारखाना सज्ज; 26 व्या हंगामात 7 लाख मे. टन ऊस गाळणार”
(निलेश गायकवाड)
इंदापूर, दि. 8 ऑगस्ट 2026 : प्रतिनिधी
निरा भीमा सहकारी साखर कारखाना आगामी 2026-27 च्या 26 व्या गळीत हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. यंदा 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी शनिवारी दिली.
शहाजीनगर ता. इंदापूर येथील कारखान्यासाठी आगामी हंगामासाठी बसविण्यात येणाऱ्या नव्या मिल रोलरचे पूजन उत्साहात पार पडले. हे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांना आवाहन
कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मशिनरी दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील 25 वर्षांपासून कारखान्याने शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिला आहे.
“यंदा धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध क्षेत्रावर ऊस लागवड करावी आणि आपला संपूर्ण ऊस निरा भीमा कारखान्याला देऊन सहकार्य करावे” असे आवाहन सौ. भाग्यश्री पाटील यांनी केले.
नदीवरील 16 बंधारे अडविणार – हर्षवर्धन पाटील
कार्यक्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे आणि भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू व शेवरे असे एकूण 16 बंधारे अडविण्याची जबाबदारी निरा भीमा कारखाना घेणार आहे.
यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच शासनाची मंजुरी अपेक्षित आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ऊस उत्पादन वाढीसाठी AI वर भर
ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन सौ. भाग्यश्री पाटील यांनी केले.
“AI तंत्रज्ञानामुळे पाणी आणि खतांची बचत होते. उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा” असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ उपस्थित होते.